पुणे : शहरातील निर्बंध काहीसे शिथिल झाले असले तरी दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात दरम्यान शहरात संचारबंदीचे आदेश कायम राहणार आहेत. संचारबंदीचे आदेश 31 मेपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला असून सरकारकडून दुकाने तसेच अन्य व्यवसाय नियम पाळून सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.चौथ्या टप्यात शहरात दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू राहणार आहे. पुणे महानगरपालिकेचे क्षेत्र, खडकी, लष्कर भागातील छावणी क्षेत्रात आदेश लागू राहणार आहेत, असे डॉ. शिसवे यांनी आदेशात नमूद केले आहे.
या आदेशाप्रमाणे कोणत्याही सार्वजनीक रस्त्यावर व गल्लोगल्लीत सायकल, दुचाकी , तीन चाकी, कार, टेम्पो-ट्रक यांचा वापर तसेच यातून प्रवास करण्यास तसेच रस्त्यावर फिरणे, उभे रहाणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारा साथरोग अधिनियम आणी भारतीय दंड विधान संहितेनूसार शिक्षेस पात्र असणार आहे.