हमाल, मापाडी मंडळाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह पाच जणांना निवेदन
पुणे(प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद आहे. परिणामी, हमाल, मापाडी आणि महिला कामगारांना काम नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मोफत अन्नधान्य कीट आणि प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात यावी, याची मागणी अनेक दिवसांपासून बाजार समितीकडे करण्यात येत आहे. मात्र, बाजार समितीकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
या मागणीची पुर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
लातूर, अहमदनगर बाजार समितीने कामगारांना मदत देण्याच्या योजनेची अंमलबजावनी करण्यात येत आहे. पुणे बाजार समितीनेही ही योजना राबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सहचिटणीस हनुमंत बहिरट, खजिनदार नवनाथ बिनवडे, संघटक संतोष नांगरे आणि गोरख मेंगडे यांनी दिली. तसेच कामगारांना विमा कवच देण्याची मागणी करण्यात येत असून, यावरही लवकर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे बहिरट यांनी सांगितले.