पुणे: महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली. त्याची आठवण करत फुले वाड्यामध्ये जलसाच्या माध्यमातून शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा जिवंत करण्यात आले. शिवाजींनी दिलेल्या आज्ञा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना दिलेल्या शिक्षा, शिवरायांची धर्मनिरपेक्ष भूमिका याबद्दलच्या शिवकाळातील घटनांचा उल्लेख करत सर्वसामान्य जनता शिवरायांसाठी मरायला का तयार झाली या प्रश्नाची उकल पोवाड्याच्या माध्यमातून करण्यात आली.
या जलसाची रचना लोकायतच्या काफिला या सांस्कृतिक आघाडीने केली होती. सादर करणाऱ्यांमध्ये अभियंते उदय देशमुख व गीतांजली प्रकाश, अजित पेंटर व जितेंद्र फापाळे हे प्राथमिक शिक्षक, वाणिज्य शाखेच्या पदवीधर वर्षा सपकाळ व मंगल निकम होते.
या जलसाचे आयोजन शिवजन्म महोत्सव समितीने शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला केले होते. यावेळी फुलांची सजावट, पताका, मावळ्यांच्या टोप्या यामुळे रंगमंच जिवंत झाला होता. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना शिवाजींचा संघर्ष हा स्वधर्मीय किंवा परधर्मीय असा नव्हता तर रयतेला त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी होता. या इतिहासातील महत्वाच्या संदर्भाकडे लक्ष न दिल्यामुळे शिवाजींचा खरा इतिहास लोकांसमोर येत नाही. तो यावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे मत नॅशनल स्टूडेंट यूनियन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रभारी आणि आयोजक भाऊसाहेब आजबे यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना समता व न्याय भारतीय संविधानाचा आत्मा आहे. तो आत्मा टिकवून ठेवायचा असेल तर राजा छत्रपती शिवजी महाराज यांनी रयतेसाठी केलेल कार्य आपल्याला समजून घ्याव लागेल ते आपल्या आचरणात आणावे लागेल असे परखड मत न्या. बी. जी. कोलसे पाटील यांनी केले.
कुठल्याही धर्माबद्दल द्वेष शिवाजींनी पसरवला नाही. धर्मनिरपेक्षताच आपल्या समाजात रुजवली असे मनोगत युक्रांदच्या शहर उपाध्यक्ष नीलम पंडीत यांनी मांडले. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, नीता रजपूत, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, लोकायतचे नीरज जैन, जनता दल सेक्युलरचे विठ्ठल सातव, भीम आर्मीचे दत्ता पोळ, जय हिंद लोकचळवळीचे संकेत मुनोत उपस्थित होते. युक्रांदचे सचिन पांडुळे यांनी आभार मांडले. सूत्रसंचालन कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी केले.