प्रभाग आरक्षणानंतरच ठरणार राजकीय पक्षांची रणनिती
जयंत जाधव
सिंहगडरस्ता – महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षणाचे वेध सर्वांना लागले आहेत. विशेषत: महिला आरक्षणाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यानुसार राजकीय पक्ष प्रभागानुसार आपली रणनिती आखणार आहेत. परंतु, प्राथमिक अंदाजानुसार निवडणुकीसाठी महिला उमेदवारांनी त्या-त्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. तर, काही ठिकाणी पुरूष उमेदवारांनी आपल्या घरातील, नात्यातील महिलांना आपल्या बरोबरीने विविध उपक्रमांसह फ्लेक्सवरही मानाचे स्थान दिले आहे. तर, बहुतांशी ठिकाणी मनपा निवडणुकीत महिला स्वकर्तृत्वावर लढण्याची तयारी करीत आहेत. याबाबत काही रणरागिणींची मतं “प्रभात’ने जाणून घेतली.
ज्याचे काम चांगले त्याला उमेदवारी…
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला संघटक निर्मला पांडुरंग बेलदरे यांनी सांगितले की, आम्ही अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करीत आहोत. पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन केले जाईल. निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना संबंधीतांचे काम पाहूनच उमेदवारी दिली जाईल. पती राजकारणी आहे आणि महिला गृहिणी आहे, असे असताना केवळ प्रभाग महिला राखीव झाला म्हणून त्याच्या पत्नीला उमेदवारी देणे आयोग्य ठरणार आहे. प्रभागात पक्षासाठी काम केलेल्या इतर महिलांचाही विचार व्हायला पाहिजे.
पक्षाशी उमेदवार एकनिष्ठ असावा…
शिवसेनेच्या राधिका दशरथ गिरमे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सिंहगड रोड भागात शिवसेनेचे काम करत आहोत. विविध आंदोलनांतून नागरिकांचे अनेक प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडविले आहेत. त्यामुळे पक्षाने या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना जे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत, अशाच महिला उमेदवारांना उमेदवारी द्यावी, असे आमचे म्हणणे आहे.
शिक्षण असणे गरजेचेच…
हिंदू महासभेच्या सिंहगड रस्ता येथे राहणाऱ्या मधुरा बर्वे यांनी सांगितले की, निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना उमेदवाराचे चारित्र्य, शिक्षण, समाजातील प्रतिमा, सामाजिक कामातील पुढाकार, प्रशासकीय अनुभव या सर्व बाबी लक्षात घेऊनच पक्षाने उमेदवारी द्यावी. उमेदवार निवडताना तो प्रामाणिक असावा, म्हणजे पाच वर्ष जनतेची कामे सुरळीतपणे होतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.
समाजाप्रती तळमळ असावी…
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अर्चना अतुल कारले यांनी सांगितले की, पक्षाने उमेदवार निवडताना तो पक्षाशी निष्ठावंत आहे का हे पहावे. समाविष्ट गावे पहिल्यांदाच महापालिकेमध्ये गेल्यामुळे गावातील समस्यांची ज्याला जाण आहे का? तसेच, प्रशासकीय कामाचा अनुभव असावा. आणि दांडगा जनसंपर्क असणे गरजेचे आहे.