पुणे -नवऱ्याने आणलेली पाणीपुरी बायकोने खाल्ली नाही. त्याचा राग आल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्याच भांडणाच्या रागातून बायकोने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना 28 ऑगस्ट रोजी आंबेगाव पठार परिसरातील सिंहगड व्हिलामध्ये घडली.
याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. प्रतीक्षा सरवदे (23) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ अंबादास सरवदे (33) याला अटक केली.
गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही आंबेगाव पठार परिसरात राहत होते. 28 ऑगस्टला गहिनीनाथने पत्नीला खाण्यासाठी पाणीपुरी आणली होती. मात्र, पत्नीने ती खाल्ली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले.वादातून प्रतीक्षाने राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर तिला तत्कळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा-दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.