फिरोजाबाद – देशात करोनाचा प्रभाव कमी होत असतानाच डेंग्यूच्या आजाराने देशातील काही राज्यात अनेकजण आजारी पडले आहेत. ताप, अंगदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत.
यातच डेंग्यूच्या आजारामुळे उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात सुमारे ४५ मुले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, डेंग्यू आणि तापाने त्रस्त असलेल्या शेकडो मुलांवर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात आणि गावातही उपचार सुरू आहेत. येथेच स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा एका आठवड्यासाठी बंद केल्या आहेत. याविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
डेंग्यूची वाढती प्रकरणे पाहता जिल्हा दंडाधिकारी चंद्र विजय यांनी ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता पर्यंत सुमारे ४५ मुलांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यू दरानेमुळे योगी सरकारवर टीका केली जात आहे.