विलगीकरणासाठी 500 खाटांची सुविधा उभारणार
पुणे – जगभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने परदेशातील भारतीय पुन्हा मायदेशात परतत आहेत. त्यामुळे या रुग्णांची विमानतळावर तपासणी केल्यानंतर त्यांना करोनाची लक्षणे नसल्यास त्यांच्या घरीच 14 दिवसांचे विलगीकरण केले जात होते. मात्र, त्यानंतरही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता परदेशातून आलेल्या नागरिकांना घरी न पाठविता, त्यांचे विलगीकरण आरोग्य विभागाकडूनच करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत.
त्यानुसार, पुण्यात 7 देशांमधून परदेशातील भारतीय येणार असून त्यांच्या विलगीकरणासाठी 500 खाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तूर्तास हे नागरिक अद्याप भारतात आलेले नसल्याने सध्या 250 खाटांची सुविधा महापालिकेने उभारली असून आवश्यकतेनुसार, त्यात वाढ केली जाणार आहे. तसेच, या नागरिकांना या विलगीकरण कक्षात 14 दिवस निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड म्हणाले, आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणाऱ्या परदेशी नागरिकांना यापूर्वी विमानतळावरच तपासणी करून घरी सोडण्यात येत होते. मात्र, त्यांना पुढील 14 दिवसांत घरातील व्यक्तींपासून दूर राहण्याच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र, आता केंद्राकडून बुधवारी रात्री नव्याने केंद्राकडून मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यात, या रुग्णांना विमानतळावरून घरी न पाठविता विलगीकरण करण्याच्या ठिकाणी पाठविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. सुमारे 7 देशांतून हे नागरिक पुण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी दोन ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारले असून त्यांना विमानतळापासून घरी न पाठविता या ठिकाणी पाठविले जाणार आहे. त्याबाबत त्यांच्या कुटुंबियांनाही माहिती दिली आहे.
दुबईमधून 150 प्रवासी पुण्यात येणार?
पुणे विमानतळावर फक्त दुबईमधून आंतरराष्ट्रीय विमाने येतात. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सुमारे 150 प्रवासी पुण्यात येण्याची शक्यता आहे. हे सर्व प्रवासी कोणत्या देशात गेले होते, त्या देशात साथीचा प्रादूर्भाव किती आहे. अशी सर्व माहिती संकलीत केली असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.