महापालिकेचा निर्णय ः पाटबंधारे विभागाने पुन्हा पाठवले पत्र
पुणे – महापालिकेस भामा-आसखेड धरणातून पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने खडकवासला धरणातील पाणीवापर कमी करून, शहरात पाणीकपात करावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाने पुन्हा केली आहे. मात्र, पालिकेने त्यास नकार देत “शहराला 18 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
भामा- आसखेड योजना 100 टक्के सुरू होण्यासाठी आणखी सहा-आठ महिने जाणार आहे. त्यामुळे पाणी कपात करता नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. महापालिकेने या पूर्वीच शहराला दरवर्षी 18 टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. तर भामा-आसखेड धरणातून दिवसाला 160 एमएलडी, तर खडकवासला धरणातून 1400 एमएलडी पाणी घेतले जात आहे.
त्यामुळे खडकवासला धरणातील पाणी कमी केल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. याशिवाय भामा-आसखेड योजना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी काही काळ जाणार आहे. सध्याच्या पाणी वितरणप्रणालीत सुमारे 30 ते 40 टक्के गळती आहे.
ती रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. तिचे कामही वेगाने सुरू असून ते पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीकपात करणे सध्या शक्य नाही, असे पालिकेने कळविले आहे.
धरणांत साडेआठ टीएमसी पाणी
खडकवासला धरणसाखळीत सध्या साडेआठ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो साडेपाच टीएमसी होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून गतवर्षी पावसाला सुरूवात झाली होती.
यंदाही तशीच स्थिती असली, तरी गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठाही जास्त आहे. त्यामुळे हे पाणी पुढील पाच ते सहा महिने पुरण्याइतके असल्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे.