पुणे – आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये गेल्या काही वर्षांत कर्मचारी भरतीच झालेली नाही. परिणामी, बोर्डातील विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे बोर्डाचे कामकाज रखडल्याची कबुलीच बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बोर्डातील अर्थ, आरोग्य, उद्यान अशा विविध विभागांमध्ये गेल्या सहा ते सात वर्षांपासून कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासकीय कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे. परिणामी, विविध प्रकल्पांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची कार्यक्षमता खालावली आहे. बोर्डाच्या अर्थ विभागाच्या आवश्यकतेनुसार आठ प्रभागांसाठी प्रत्येकी दोन कर संकलन अधिकारी असे एकूण 16 अधिकारी यांची गरज आहे. प्रत्यक्षात केवळ पाच ते सहा अधिकारी काम करत आहेत. त्याचप्रमाणे बोर्डाच्या उद्यान विभागामध्ये पूर्वी 50 कर्मचारी कार्यरत होते. मात्र, सध्या ही संख्या केवळ चार कर्मचारी इतकी आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत असून, त्यामुळे आवश्यक त्याठिकाणी लक्ष देता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
याबाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले,”बोर्डासमोर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य होत नाही. अशावेळी आणखी कर्मचारी भरती कशी करणार? बोर्डाची गरज आणि इच्छा असूनही, सध्या कर्मचारी भरती करता येत नसल्याने, बोर्डाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.’