पुणे – आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई पुणे विद्यापीठ चौक) पीएमआरडीएकडून मेट्रो ३ प्रकल्प आणि चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामासाठी पुढील काही दिवसांत या रस्त्यावर वाहतूकीसाठी दोन्ही बाजूस केवळ साडेतीन मीटर लांबीचा रस्ता ठेवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या चौकात दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
बुधवारी दिवसभर या चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अवघा २०० मीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी तब्बल ४० मिनिटांचा लागत होता. तर या कोंडीचा फटका या चौकाला जोडणार्या इतर रस्त्यांनाही बसला. यामुळे वाहनचालकांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली. चौकात मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही ही कोंडी झाल्याचे दिसले.
या चौकात उड्डाणपूलाचे काम करण्यात येणार असल्याने महापालिकेने हा रस्ता ४२ मीटर रूंद केला आहे. तर उर्वरित रूंदीकरणासाठी येथील झाडे काढण्यात येत होती. मात्र, त्याविरोधात नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने वृक्षतोडीस मनाई केली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत असल्याने पीएमआरडीएच्या सूचनेनुसार या चौकातील वाहतूक लवकरच वळविण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या चौकात प्रंचड वाहतूक कोंडी होत आहे.
नसतीच पाहणी, उपाय शून्य
या चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू करायचे असल्याने महापालिका, पीएमआरडीए तसेच पोलिसांकडून प्रत्येक आठवड्याला पाहणी दौरे केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही उपाय योजना होत नसल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर कोंडी वाढत असल्याने जड वाहनांना वेळेचे बंधन, लहान वाहनांना पर्यायी रस्ते, वाहतूक पोलीस-वाॅर्डन संख्या वाढविणे, रस्ता दुरूस्ती, वाहतूक वळविणे अशा उपाय योजनांची नुसतीच चर्चा केली जात आहे. हे तीनही विभाग एकमेकांवर जबाबदारी झटकण्यात व्यस्त आहेत.
तर कडेलोटच होणार..
अद्याप या चौकात प्रत्यक्षात पूलाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार लेन वाहतूकीसाठी खुल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात पूलाचे काम सुरू झाल्यानंतर एकच लेन वाहतूकीसाठी असणार आहे. त्यामुळे, सध्या कोंडीचे हे चित्र असेल तर पूलाचे काम सुरू झाल्यानंतर काय असा मोठा प्रश्न असून याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. तर, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय नेते उड्डाणपुलाच्या कामासाठी आग्रही असून वाहतूक कोंडीबाबत बोलण्यास तयार नाहीत.