पुणे – ऋतू कोणताही असो, तुम्हाला डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे पाहायचे असतील, तर एनडीए चौकात या…अशी मिश्किल टिप्पणी कोथरूडकर वारंवार करताना दिसतात. त्याचबरोबरच ही गळती थांबवा, दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते, अशी विनंतीही अधिकाऱ्यांकडे करतात. मात्र, मागील काही महिन्यांत ही गळती थांबविण्यात प्रशासनालाच वेळ नसल्याचे दिसून येते.
एनडीए चौकात मुळशी, बावधनकडून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. जवळपास ८ लाख ८ हजार लिटर क्षमता असलेल्या एकूण दोन टाक्या याठिकाणी आहेत. तेथून कोथरूड, बावधन आणि पाषाण परिसरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, मागील काही महिन्यांपासून या डोंगरमाथ्यावरून खाली पडणारे पाणी हे टाक्यांच्या गळतीमुळे होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे 24 तास 12 महिने याठिकाणी पाणी वाहत आहे. पर्यायाने डोंगर उतार आणि पदपथावर शेवाळ पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथ असूनही चालता येत नाही. जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे.
या गळतीबाबत स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधी किरण दगडे, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे यांच्यासह कुणाल वेडेपाटील, शंकर केमसे, सूर्यकांत भुंडे, धनंजय दगडे, अभिजीत दगडे, प्रशांत कन्होजिया, राजाभाऊ जोरी यांनी प्रशासनाला सांगत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत मागणी केली.
शहरात आधीच पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे, असे असताना पाण्याची नासाडी होणार नाही याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे तत्काळ पाणीगळती बंद करून पाण्याची बचत करावी, असे नागरिकांनी सांगितले.
“पाणी गळती कोठून होते, याबाबत पाहणीचे काम सुरू आहे. पाइपलाइनमधून गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत काम सुरू असून, तत्काळ ही गळती थांबविण्यात येईल.” – नरेंद्र परदेशी, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे मनपा