पुणे – महापालिकेकडून शहरात समान पाणी योजने अंतर्गत बसविण्यात येणार्या पाणी मीटरसाठी ३१ मार्च २०२४ ही मुदत निश्चित केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेकडून मागील काही महिन्यांत दिवसाला ४०० ते ५०० मीटर बसविण्यासाठी नियोजन करत १० पथकेही नेमली होती. मात्र, महापालिकेचा मीटर बसविण्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने दिवसाला केवळ ४० ते ५० मीटरच बसविले जात आहेत.
तर, महापालिकेस अद्यापही शहरात तब्बल १ लाख ४८ हजार मीटर बसविणे बाकी असून तीन महिन्यांत हे काम पूर्ण कसे होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्याच्या वेगाने मीटर बसविण्यात आल्यास हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेकडून शहरात तब्बल २५०० कोटी रूपये खर्च करून समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंंतर्गत महापालिकेकडून शहरात २ लाख ८६ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. हे मीटर स्वतंत्र मिळकती तसेच सोसायट्यांच्या नळजोडांना बसविण्यात येत आहेत. हे काम सुरू झाल्यापासून महापालिकेने शहरात अद्यापपर्यंत १ लाख ४५ हजार पाण्याचे मीटर बसविले आहेत. कधी मीटर नसल्याने, कधी मीटर बसविण्यास विरोध होत असताने तर कधी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने हे काम रखडत आहे.
आयुक्तांच्या आदेशाला हरताळ
समान पाणी पुरवठा योजनेचा आढावा महापालिका आयुक्तांनी मागील आठवड्यात घेतला होता. या आढावा बैठकीत मीटर बसविण्याच्या कामाचा वेग कमी असल्याने महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच मीटर बसविण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केल्यानंतर महापालिकेने नेमलेल्या पोलिसांचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १० कर्मचारी सोबत घेऊन ही कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागानेही अतिक्रमण विभागाकडे या कर्मचार्यांची मागणी केली. मात्र, त्यानंतर अद्यापही अतिक्रमण विभागाकडून सुरक्षा रक्षक देण्यात आलेले नसल्याने आयुक्तांच्या आदेशालाही हरताळ फासत असल्याचे चित्र महापालिकेत आहे.
“पाण्याचे मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध होत आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या सूचनेनुसार सुरक्षा विभागाकडे कर्मचारी मागणी करण्यात आली आहे. हे कर्मचारी मिळाल्यानंतर कामास गती येईल.” – नंदकिशोर जगताप, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, मनपा