पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. ही वाढ का झाली ? याचा शोध राज्य मंडळाकडून घेतला जात आहे. यंदा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्यामुळे १७ नंबरचा अर्ज भरून विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत का? याबाबत शोध घेण्याचे युध्दपातळीवर काम्र सुरू करण्यात आले आहे.
राज्य माध्यमिक मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. दरवर्षी इयत्ता बारावीसाठी साधारणपणे १४ लाख ६० हजार विद्यार्थी तर दहावीसाठी साधारणपणे १५ लाख ८० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. मात्र यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सद्यस्थितीत इयत्ता दहावीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत २५ ते ३० हजारांनी वाढल्याचे दिसून आले आहे. तर बारावीचे ५० हजार विद्यार्थी वाढले आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. एनईपीअंतर्गत पुढील काही वर्षात दहावी- बारावीला असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्याला अवधी असला तरी त्यांच्या धास्तीने १७ नंबरचा अर्ज भरून विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याची तपासणी राज्य मंडळ करत आहे.
“करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकालही अधिक लागला होता. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती. हेच विद्यार्थी आता इयत्ता बारावीत आले आहेत. त्यामुळे बारावी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र् दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या का वाढली ? याचे कारण शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे.” – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ