पुणे – “यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची चिन्हे आहेत. तसेच “एल-निनो’ मुळे पावसाचे प्रमाणही कमी राहण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. त्यावर खरबदारी म्हणून पाणी व्यवस्थापन आराखडा व आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा करा,’ असे आदेश राज्यशासनाने महापालिकेस दिले होते. मात्र, हा आराखडा पालिका प्रशासनाने अजूनही तयार केलेला नाही. शासनाने त्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, गतिमान कारभाराचा नारा देणाऱ्या प्रशासनास त्यासाठी वेळच मिळालेलाना नाही. त्यामुळे शासनाने पालिकेस ई-मेल पाठवून हा आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.
उन्हाळ्यातील पाणीस्थितीबाबत महापालिका आणि पाटबंधारे विभागाची बैठक झालेली असून महापालिकेकडून या बैठकीत चर्चेच्या आधारावर हे दोन्ही आराखडे तयार केले जाणार आहेत. राज्यात दरवर्षी उन्हाळ्यात नागरी भागात पाणीटंचाई निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन आगामी कालावधीत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये. तसेच उद्भवल्यास यंत्रणा सज्ज असावी, या उद्देशाने राज्याच्या मुख्य सचिवांनी 13 मार्च रोजी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हे आदेश देण्यात आले होते. याबाबतचे पत्र महापालिकेस 16 मार्च रोजीच मिळाले होते. मात्र, प्रशासनाकडून गेल्या दोन आठवड्यांत त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शहराच्या पाण्याबाबत महापालिका किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शासनाला पाठवण्याची आवश्यक माहिती
खडकवासला धरणसाखळीत चारही धरणांतील पाण्याची सद्यस्थिती काय?
काटकसरीने पाणी वापरल्यास तसेच पाऊस लांबल्यास हे पाणी पुढे किती दिवस वापरता येईल, याचे नियोजन
महापालिकेस 31 ऑगस्टपर्यंत प्रत्येक महिन्यास किती पाणी लागेल?
पाऊस लांबल्यास तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास पाण्याचे पर्यायी स्रोत कोणते?
शहराचा आकस्मिक पाणी आरखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिका आयुक्तांची मान्यता घेऊन तो लवकरच शासनास पाठविण्यात येणार आहे.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख