पुणे – शहरात चोवीस तास समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 3 हजार 312 कोटी रुपये खर्चाची समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. मात्र, योजेनतून सल्लागाराने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे महापालिका नव्याने सल्लागार नेमणार असून, तो नेमताना अनुभवाच्या अटीच शिथिल केल्या आहेत. त्यामुळे एवढे मोठे काम असूनही अनुभव नसलेला सल्लागार नेमल्यास या योजनेचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.
समान पाणी पुरवठा योजनेचे काम “एसजीआय’ या सल्लागार कंपनीस दिले होते. कंपनीने या प्रकल्पाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र, करोना तसेच इतर कारणे देत सुमारे 18 कोटींचे सल्लाशुल्क घेऊन या कंपनीने काढता पाय घेतला आहे. निविदा मागविण्याची मुदत 7 जानेवारीला संपत आहे.
तांत्रिक अनुभवाची अट काढली
महापालिकेने सल्लागारसाठी निविदा काढताना या प्रकारचे काम केल्याच्या अटीच शिथिल केल्या आहेत. त्यात चोवीस तास समान पाणी योजनेचे काम करण्याचा अनुभवचा मुद्दाच हटवला आहे. योजनेच्या नावातून चोवीस तास पाणी हा शब्दच वगळला आहे. तसेच केवळ पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याच्या अनुभवाची अट ठेवली आहे. शहरात 3 लाख पाणीमीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे किमान 10 टक्के मीटर बसविण्याचा अनुभव ठेवणे आवश्यक होते.
मात्र, प्रत्यक्षात 10 हजार मीटर बसविण्याचीच अट टाकली आहे. तसेच अनेक तांत्रिक अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही पाणीपुरवठा योजनेचे काम केलेला सल्लागार या कामात सहभागी होणार आहे. अशा व्यक्तींना काम मिळाल्यास तांत्रिक अनुभवच नसल्याने या योजनेच्या कामावर परिणाम होण्याची भीती आहे.