पुणे – सुरक्षित रस्ते वाहतुकीच्या नियमावलीत पादचारी हा रस्त्याचा राजा असल्याचे म्हटले गेले आहे. पण, प्रत्यक्षात शहरातील जवळपास सर्व प्रमुख चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून हा राजा बेघर झाला आहे. या राजाची जागा अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि पार्किंगने घेतली आहे. आज पादचारी दिवस साजरा केला जात असताना या रस्त्याच्या राजाबद्दलची अनास्था मांडण्याचा हा प्रयत्न…
वाहनचालकांमध्ये पादचार्यांबाबत असलेल्या अनास्थेमुळे शहरात दरवर्षी होणार्या एकूण अपघातांमध्ये ३४ टक्के प्राणांतिक अपघात हे पादचार्यांचे असतात. यात दरवर्षाला सरासरी १०० पादचाऱ्यांचा बळी जातो. प्रत्यक्षात पादचार्यांबाबत संपूर्ण वर्षभर जनजागृती तसेच त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा विरहित सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. पण, त्याकडे महापालिका, वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
वर्षातून एकदा पादचारी दिवस साजरा करून उरलेले ३६४ दिवस या रस्त्याच्या राजाला बेघर केले जात असल्याचे वास्तव आहे. शहरातील मध्यवर्ती पेठा, मुख्य वर्दळीचे चौक तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र हेच चित्र असल्याचे दैनिक प्रभातच्या प्रतिनिधींनी स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, नगररस्ता, सातारा रस्त्यावरील चौकांमधील पाहणीतून समोर आले आहे. पादचार्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी महापालिकेने अर्बन स्ट्रीट उपक्रमाअंतर्गत पदपथ विकसित केले आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर पादचारी क्राॅसिंगही उभारलेले आहेत. मात्र, पदपथांवर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
तर, उर्वरित रस्त्यांवर थेट चारचाकी वाहने पार्किंग केली जाातात. भरीस भर म्हणून महापालिकेनेही पदपथावरच पथदिवे तसेच स्ट्रीट फर्निचर उभारले असून त्यावर चक्क व्यवसाय केला जातो. तर उर्वरित जागेत महावितरणचे फीडर पिलर उभे आहेत. त्यामुळे पादचार्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. अनेकदा तर वाहनांच्या गराड्यात सोबतचे साहित्य, लहाने मुले घेऊन नागरिक धोकादायक प्रवास करतात. महापालिका तसेच वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर हा प्रकार सुरू असतो.
पादचारी सिग्नल नावालाच
महापालिकेने शहरात नव्याने बसवलेल्या १२५ चौकांमधील सिग्नल यंत्रणेत पादचार्यांसाठी स्वतंत्र सिग्नल ठेवला. मात्र, अनेक ठिकाणी त्याची वेळ अवघी ८ ते १० सेकंद होती. ही बाब लक्षात आल्यानंतर ही वेळ १५ सेकंद करण्यात आली आहे. त्यानंतरही प्रत्यक्षात ३ ते ४ सेकंदच पादचार्यांना मिळतात. मुख्य चौकांमध्ये अनेक वाहनचालक लाल दिवा लागल्यानंतरही वाहने पुढे नेतात. परिणामी, पादचार्यांचा सिग्नल यातच जातो. अनेक जण झेब्रा क्राॅसिंगवरच वाहने उभी करतात. परिणामी, नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावर मुख्य चौकात येऊन रस्ता ओलांडावा लागतो आणि पादचारी अपघाताचे शिकार होत आहेत.
“पुण्यातील वाहनांची संख्या अशात खूप वाढली आहे. पूर्वी कधीही इतकी गर्दी दिसत नव्हती. परंतु आता मात्र रस्ते ओलांडणे जोखमीचे झाले आहे. यावर काही उपाय निघावा आणि फुटपाथ थोडे स्वच्छ आणि मोकळे असावेत.” – अलका गोखले, पादचारी
“पूर्वी सायकल चालवणाऱ्यांना आणि रस्त्यावर चालणाऱ्यांनाही कुठलीही अडचण येत नव्हती. रहदारीत सुसूत्रता होती. वाहने वाढली, तशा अडचणीही वाढल्या. शासनाने नियमांची अंमलबजावणी तर करावीच, पण कुठेतरी सामान्य नागरिक म्हणून आपणही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.” – शरद सेवेकरी, ज्येष्ठ नागरिक
“वेगाने धावणारे दुचाकीचालक, रस्ता हा मालकीचा असल्याप्रमाणे जागा मिळेल तेथे पार्क करणारे चारचाकी चालक, “विमान” चालवणारे पीएमपी बसचालक, एवढे सारे थोर लोक रस्त्यावर असताना आपल्यासारख्या अतिसामान्य मनुष्याने रस्त्यावर चालावे की नाही, हा प्रश्नच आहे.” – प्राक्तन पाटील, नोकरदार