आमदार जयकुमार गोरे; भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या तीन वर्षापासून भाजपची बूथरचनेच्या माध्यमातून सातत्याने तयारी सुरू आहे . या मतदारसंघावर कोणी किती दावा केला तरीही त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपचाच उमेदवार लढवणार असा स्पष्ट दावा माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महायुतीतील घटक पक्ष मुख्यमंत्री शिंदे गट, अजित दादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष व भारतीय जनता पार्टी यांनी स्वतंत्रपणे सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने उमेदवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा केल्याने पुन्हा या चर्चांनी उचल खाल्ली. या चर्चांचे खंडन करताना आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची बाजू मांडली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने बूथरचनेची गेल्या तीन वर्षापासून बांधणी करत आहे. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय पक्षनिरीक्षकांचा सातत्याने येथे दौरा सुरू आहेत. सध्या आठही विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढले असून भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवार लढवणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा राष्ट्रवादी लढवणार असा दावा केला होता. या संदर्भात बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, हा दावा त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. जागा वाटपाच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तिन्ही घटक पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लोकशाहीमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या जागेवर सातत्याने दावा केला जाऊ शकतो. मात्र भाजपचा जिल्हास्तरीय रचनेमध्ये सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे काम सुरू आह. त्यामुळे कोणी किती दावा केला तरी सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवारच लढणार असे स्पष्टपणे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
लोकसभेसाठी कोणता उमेदवार निवडला जाऊ शकतो, या संदर्भात बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. अधिवेशनानंतर केंद्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये या विषयांची चर्चा होईल वरिष्ठ कार्यकारणीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचे आम्ही निश्चितच काम करू. माढा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात बोलताना ते म्हणाले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आमचे चांगले मित्र आहेत. पुन्हा त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळाली तर मला मित्र म्हणून निश्चितच आनंद वाटेल.
शशिकांत शिंदे यांनी आपले स्वतःचे बघावे
महाविकास आघाडीने सुद्धा सातारा जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले आमदार शशिकांत शिंदे यांनी आपले स्वतःचे बघावे दुसऱ्याचे पक्षात डोके घालू नये. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बसायला माणसे नव्हती असे माझे निरीक्षण आहे. राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात मजबूत होता हा भूतकाळ झाला. आता सध्या परिस्थिती तशी नाही. राष्ट्रवादीची ताकद आता दोन गटात विभागणी केली आहे, त्यामुळे भाजपचा बलाढ्य पक्ष ठरलेला आहे.