पुणे – विकसित देशांमुळे हवामान बदलाची समस्या निर्माण झाली. परंतु त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम विकसनशील देशांना सहन करावे लागत आहेत. एकमेकांना दोष देण्यापेक्षा त्यावर ठोस पावले उचलली पाहिजेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
बांबू संशोधक डॉ. पी. तेताली आणि श्रीनिवास खरे यांनी लिहिलेल्या वंशसंहिता या पुस्तकाचे प्रकाशन सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुक्रवारी फर्गसन महाविद्यालयामध्ये करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. इंडिया बांबू फोरम, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रभू म्हणाले, 1998 मध्ये मी पर्यावरण मंत्री असताना बांबू लागवडीबाबत धोरण निश्चित केले. त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. कार्बन विसर्जनाची निसर्गाची क्षमता संपलेली आहे. त्यावर बांबूची लागवड हा एक मार्ग आहे. पश्चिम घाट आणि तेथील जैववैविध्य वाचविण्यासाठी, शेतकऱ्याचे हितसाठी बांबूची लागवड आवश्यक आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, माजी सनदी अधिकारी गिरिराज, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, फर्गसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे अध्यक्ष सुनील भिडे, लेखक डॉ. पी. तेलाली, राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे, तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांची प्रमुख उपस्थिती होती. भोर, वेल्हा व मुळशी तालुक्यातील बांबू उत्पादक, उद्योजक शेतकऱ्यांचा कार्यशाळेत सहभाग हेाता.