पुणे –“टीईटी’ घोटाळ्याचा सवीस्तर अहवाल पोलिसांकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांवर काय कारवाईबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी कारवाईचा अभिप्राय शासनाला कळविण्यात येणार आहे.
“टीईटी’च्या निकालात गडबडी करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले आहे. सुमारे आठ हजार उमेदवारांच्या निकालात फेरफार झाल्याची बाब तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जी.ए.सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजीच्या संचालकांसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांकडून दोषारोपपत्रही दाखल झाले आहे.
परीक्षा परिषदेकडे “टीईटी’ची प्रमाणपत्रेही पडताळणीसाठी दाखल झाली आहे. मात्र, ती काही महिन्यांपासून तपासणीविना धूळखात पडली आहेत. पोलिसांकडून उमेदवारांची यादी मिळाल्यावरच या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा पवित्रा परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या यादीतील उमेदवारांची प्रमाणपत्रे वगळून उर्वरित प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. दरम्यान पोलिसांनी चौकशी व तपासणी अहवाल सादर करावा, अशी मागणीही परीक्षा परिषदेने पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.
पोलिसांकडून सर्व्हरमधील डेटा व इतर कागदपत्रे, ओएमआर आदींची केलेली तपासणी याची सखोल माहिती मिळाल्यानंतर परीक्षा परिषदेला पुढील कारवाईची दिशा मिळणार आहे. शासनाकडून पत्र आल्यानंतर शासलानाला कारवाई करण्याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.