पुणे –दोन वर्षांत तब्बल निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 57 टक्के भारतीयांची “झोप उडाली’ आहे. “रेसमेड’ या संस्थेने केलेल्या एका संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे. गेल्या दोन वर्षांत रात्री उशीरा झोपायचे आणि सकाळी उशीरा उठायचे ही गोष्ट सर्वसामान्य केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचे यातून दिसून आले आहे.
करोनाकाळात अनेकजण संपूर्णवेळ घरातच होते. त्यामुळे दुपारी वामकुक्षीऐवजी चांगली ताणून झोप, खाण्या-पिण्याचे अनेक नमुने बनवणे, रात्री उशीरापर्यंत जागून चित्रपट पाहणे त्यामुळे उडालेली झोप या सगळ्या गोष्टींचा विपरित परिणाम एकूणच मन:स्वास्थ्यावर झालेला दिसतो.
गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये जागतिक पातळीवरच निद्रानाशाचा विकार वाढला आहे. एकट्या भारतामध्ये, 57 टक्के लोकांना चांगल्या गुणवत्तेची झोप येत नाही. करोनाकाळात लोकांमध्ये अस्वस्थता आणि भयाचे वातावरण त्यामुळे ही स्थिती अधिक गंभीर झाली; यामध्ये विशेषतः व्यावसायिक अस्वस्थता वाढली होती.
काही वर्षांपासून, रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी अनेक संशोधने केली गेली. योग्य प्रमाणातील झोप, आपले शरीर, मन आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवते. तथापि, रात्रीची चांगली झोप येणे ही आव्हानात्मक बाब आहे, असे असताना त्यालाच दोन वर्षांत अनेकांनी हरताळ फासला आहे. नुकतीच, “रेसमेड’ या संस्थेने झोपेचा अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांनी भारतातील पाच हजार लोकांना विविध प्रश्न विचारले. त्यामध्ये बहुतांश म्हणजे 81 टक्के नागरिकांना झोपेचे महत्त्व माहित होते, एवढी एकच सकारात्मक बाब यातून दिसते.
मानसिक आरोग्याची सुद्धा समस्या
झोपेचे वेळापत्रक बिघडल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम शरीर चक्रावर झाला. याशिवाय, टीव्ही बघण्याची सवय आणि झोपेच्या आधी मोबाइल फोन वापरण्याची सवय या गोष्टींमुळे झोपेची गुणवत्ता खालावली. याव्यतिरिक्त 59% लोकांना घोरणे म्हणजे रात्रीच्या चांगल्या झोपेचे लक्षण आहे असा गैरसमज मनामध्ये निर्माण झाला होता. तसेच “ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया’ (ओएसए) यांच्यानुसार हे अज्ञानाचे लक्षण होते. 72 टक्के लोक ज्यांना कमी झोपेची समस्या होती, अशा लोकांना मानसिक आरोग्याची सुद्धा समस्या आढळली. या समस्या विषयी कोणतीही जागृती नसणे ही एक चिंताजनक बाब आहे आणि या समस्येसाठी योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे.