माती, गादी विभागातील प्रत्येक वजनी गटात 60, 55 व 50 हजारांची बक्षिसे
सातारा – तब्बल 61 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्यात मंगळवार, दि. 5 पासून रंगणार आहे. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात होणाऱ्या स्पर्धेत तब्बल 900 मल्ल 45 संघांमधून एकमेकांशी झुंजणार आहेत. गादी आणि माती विभागातील 57 ते 125 किलो वजनी गटांमधील विजेत्यांना तब्बल 33 लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभाग जय्यत तयारी करत आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनाचे स्थळ सातारा ठरल्यानंतर छत्रपती शाहू क्रीडा संकुलाला नवी झळाळी मिळाली आहे. जिल्हा तालीम संघ व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने तयारी सुरू आहे. युवराज नाईक व त्यांची 12 कर्मचाऱ्यांची टीम गेले चार दिवस राबत आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, निमंत्रक सुधीर पवार व दीपक पवार हे या तयारीचा आढावा घेत आहेत. या स्पर्धेला पन्नास हजाराहून अधिक कुस्तीशौकिन उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. मल्लांसाठी निवास, भोजन, पाणी, वीजपुरवठा, वैद्यकीय, वाहतूक, क्रीडांगण व्यवस्था, वाहनांसाठी पार्किंग, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, स्पर्धेची प्रसिद्धी, सुरक्षाव्यवस्था, उद्घाटन व बक्षीस वितरण यांचे नियोजन केले आहे.
मल्लांसाठी बॅडमिंटन कोर्ट इमारत, रयत शिक्षण संस्थेच्या काही इमारती, छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलासमोरील धंदेवाईक शिक्षण शाळा, पोवई नाक्यावरील महाराजा सयाजीराव विद्यालय, माजी सैनिक मुलांचे वसतिगृह येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेसह गादी आणि माती विभागातील 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 125 वजनी गटांमधील विजेत्या मल्लांना रोख बक्षिसे आणि दोन्ही विभागांमधील प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख स्वरूपात मानधन दिले जाणार आहे.
प्रथम क्रमांकाला 60 हजार, द्वितीय क्रमांकाला 55 हजार व तृतीय क्रमांकाला 50 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. जिल्हा क्रीडा समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. स्पर्धेसाठी सर्व बारीकसारीक कामे व तपशीलावर ते स्वतः बारकाईने लक्ष देत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 5) मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा अंतिम आखाडा शनिवार, दि. 9 रोजी रंगणार असून मानाची चांदीची गदा कोण पटकावणार, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. बक्षीस वितरणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.