पुणे- महाराष्ट्र आणि देशभरात गेल्या दोन दशकांत अनेक बाबतीत विकास घडला आहे. ज्यामुळे नैसर्गिक बदल होऊन वातावरणावर प्रचंड ताण आला आहे. पायाभूत सुविधा नसताना, नियोजन न करता इमारती बांधल्या जात आहेत, अशी खंत वास्तुविशारद सी. आर. राजू यांनी व्यक्त केली.
“इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस्’ (आयआयए) महाराष्ट्र चॅप्टर पुणे सेंटरच्या 24 व्या “महाकॉन’ अधिवेशनाला ते उपस्थित होते.
हे बांधकाम करताना सूचनांनुसार बदल करण्यासाठी आणि निर्णयांची पूर्तता होते आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सरकारी संस्था आणि “आयआयए’ यांना सामील करून घ्यावे लागणार आहे. आपण विकासाबद्दल बोलतो. परंतु, सध्याच्या मोठ्या प्रमाणातील बांधकामांनी जमिनीवर ताबा मिळवला आहे. ज्याची खरंच गरज नाही, असे मत राजू यांनी व्यक्त केले.
बिमल पटेल, आयआयए महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष संदीप बावडेकर, आयआयए पुणे चॅप्टरचे अध्यक्ष संदीप खाटपे, कृष्णा मूर्ती, महेश नामपूरकर, मनोज तातुसकर आणि विकास अचलकर आदी वास्तुविशारद यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटीचे नियोजक ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आमच्या पूर्वजांनी अशी घरे बांधली जी शेकडो वर्षे टिकू शकतात. परंतु, आजच्या इमारतींची जीवनचक्र कमी कालावधीचे आहे. आपण आपल्या नैसर्गिक संसाधनांचा कुठे अपव्यव करत आहोत, याचा आपण विचार करायला हवा. सिमेंटची जंगले बांधणे आपल्याला टाळावे लागेल. तसेच महाराष्ट्रात वास्तुविशारद महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे धोरण ठरवावे लागेल. अतर्क्य, काल्पनिक आणि माहिती नसलेल्या गोष्टी जनतेची दिशाभूल करू शकतात. तसेच प्रकल्पामध्ये व्यत्यय आणू शकतात. सरकारी संस्था आणि व्यावसायिकांना प्रकल्प सुधारण्यासाठी जनतेला कसे गुंतवून ठेवायचे हे शिकण्याची गरज आहे आणि सार्वजनिक चर्चा अधिक चांगल्या प्रकारे माहिती होईल याची खात्री करणे आवश्यक आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.