पुणे- पीएमपीने उत्पन्नवाढीसाठी पीएमआरडीए हद्दीत बससेवा सुरू केली. एसटीच्या संपामुळे जिल्ह्यातील बसेसचे मार्ग वाढवण्यात आले. मात्र, आता एसटीची सेवा सुरू झाल्याने “कॉमन’ मार्गावरील बसेस पीएमपीने बंद कराव्यात, अशी मागणी एसटी प्रशासनाने केली आहे. परंतु, एसटी आणि पीएमपीच्या सेवांच्या या पेचात प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी पीएमपीने उत्पन्नवाढ आणि प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर बससेवेचा विस्तार केला. सध्या ग्रामीण भागातील सुमारे 78 मार्गांवर बसेस धावत आहेत. मात्र त्यापैकी अनेक मार्गांना “ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे. पीएमपी प्रशासनाकडून ग्रामीण भागातील मार्ग आर्थिक गणितामुळे बंद करण्याचे नियोजन होतेच. यात आता एसटीच्या मागणीची देखील भर पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा ग्रामीण भागातील मार्गांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्याच्या विविध भागातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ये-जा करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, शेतकरी यांची संख्या अधिक असते. पीएमपीच्या बसेसची वारंवारितेमुळे प्रवाशांना गावाहून ये-जा करणे सोयीचे होत होते. आता पीएमपी आणि एसटीच्या ग्रामीण भागातील मार्गांच्या भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. यासह एसटीची वारंवारिता तुलनेने कमी असल्याने अधिक गैरसोय होणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी कोंडीत सापडले होते. त्यातून कशीतरी सुटका होत असताना, आता एसटीच्या भूमिकेमुळे नवी कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर आता काय तोडगा काढला जातो, याकडे पुणे शहर आणि ग्रामीण प्रवाशांचे लक्ष लागून आहे.
एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बससेवा सुरू झाली असल्याने पीएमपी मार्ग बंद करावेत, अशा आशयाचे पत्र दिले आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.
– चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
सध्या विभागात सुमारे 700 हून अधिक बसेस धावत असून, सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सुमारे 14 हून अधिक मुख्य मार्गांवर पीएमपी आणि एसटीची समांतर वाहतूक होत आहे. यामध्ये जेजुरी, मोरगाव, सारोळा, वेल्हा, मुळशी, मंचर, जुन्नर आदी मार्गांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीला पत्र दिले आहे.
– ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग