पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत आहे. नागरिकांना ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नसल्याने चिखली येथील संतप्त महिलांनी आज महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारांना टाळे लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महिलांनी आमचे गाऱ्हाणे ऐकल्याशिवाय परत जाणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेतली.
सद्यस्थितीत शहरामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पोहचत नाही. पाणी आलेच तर ते अवघ्या तासाभरासाठी येते, त्या कालावधीत मुबलक पाणीसाठा करता येत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 29 ) चिखलीतील महिलांनी महापालिका भवनवर हंडा मोर्चा काढला. महिलांचा मोर्चा येत असल्याचे बघून महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर टाळे लावण्यात आले. जोपर्यंत आम्हाला महापालिकेत जाऊन देणार नाही अथवा संबंधित अधिकाऱ्यांना भेटू देणार नाही तोपर्यंत जाणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला.