प्रतिकांची अवस्था दयनीय : मनपा, सामाजिक संघटनांचे दुर्लक्ष
पुणे – शहरात थोर व्यक्ती आणि महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. पण, त्यांची अवस्था दयनीय आहे. केवळ जयंती-पुण्यतिथीलाच आणि महापालिकेस वेळ-निधी मिळाला तरच पुतळ्यांची स्वच्छता केली जाते.
ज्या हद्दीत हे पुतळे असतात, त्याच्या आसपासचा परिसर मनपा क्षेत्रीय कार्यालय स्वच्छ ठेवते. त्यामुळे पुतळे तसेच शिल्पांची कोणतीही जबाबदारी पालिकेने निश्चित केलेली नाही. शहरातील काही पुतळ्यांना मेघडंबरी करण्यात आली आहे. त्याचा परिसरही सुरक्षित आहे. मात्र, अनेक पुतळे आणि शिल्प रस्त्यातच असून त्यावर नागारिक कबुतरांना खायला टाकतात.
ही कबुतरे तेथेच घाण करतात. प्रत्यक्षात दर 15 दिवसांनी हे पुतळे स्वच्छ करणे अपेक्षित असून, त्याची जबाबदारी एका विभागावर निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र, महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून पुतळ्यांची स्वच्छता केली जाते. तसेच वर्षाअखेरीस केवळ निविदा काढून कागदोपत्री स्वच्छता केली जाते. या शिल्पांची नियमित देखभाल दुरूस्ती करणे आवश्यक असताना त्यासाठीची कोणतीही यंत्रणा महापालिका प्रशासनाकडे नाही.
अस्वच्छतेने अवहेलना होणार असल्यास यापुढे पुतळे उभारू नयेत. प्रत्येक महिन्याला या पुतळ्यांची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. ही जबाबदारी पूर्णत: महापालिकेची आहे.
– विवेक वेलणकर,
अध्यक्ष, सजग नागरिक मंच
‘यांची’ जबाबदारी नाही का?
सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांच्या आग्रहाखातर महापालिका थोर व्यक्तिमत्व, महापुरुपांचे पुतळे तसेच वेगवेगळी शिल्प उभारते. मात्र, पुढे या प्रतिकांची जबाबदारी मात्र कोणीही घेत नाही. त्यामुळे किमान या घटकांनी तरी पुतळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.