खेडच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळले – माजी आमदार सुरेश गोरे
शिंदे वासुली(प्रतिनिधी) – भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन खेड तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या भूमिकेमुळे चिघळले आहे, असा आरोप माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे.
गेली काही दिवसांपासून भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा तीव्र स्वरुपात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता शिवसेनेही उडी घेतली आहे. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन मुक्त करा व ठरल्याप्रमाणे एक किमी जलवाहिनेचे काम बंद ठेवा अन्यथा शिवसेना आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे.
भामा आसखेड आंदोलनप्रकरणी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी आमदार सुरेश गोरे बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, माजी उपसभापती भगवान पोखरकर, लक्ष्मण जाधव, बिपीन रासकर आदी शिवसेना नेते उपस्थित होते.