मॉस्को – जागतिक लोकसंख्येत शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) सदस्य असणाऱ्या 8 देशांचा वाटा 40 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे एससीओ विभागातील शांतता आणि सुरक्षेसाठी विश्वास, सहकार्याचे वातावरण आवश्यक आहे. शांततेसाठी आक्रमकता टाळायला हवी, अशी परखड आणि ठाम भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज मांडली.
त्यातून त्यांनी कुरापतखोर चीनला अप्रत्यक्ष पण स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे.
जवळपास चार महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती आहे. चिनी सैनिकांच्या आगळिकींमुळे ती स्थिती उद्भवली आहे. त्यापार्श्वभूमीवर, रशियाच्या राजधानीत एससीओची मंत्रिस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीला राजनाथ आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे उपस्थित राहिले. बैठकीत भाषण करताना राजनाथ यांनी नामोल्लेख टाळून चीनवर निशाणा साधला.
आक्रमक मानसिकता टाळण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा संदर्भ दिला. त्या महायुद्धाच्या समाप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली. एका देशाने दुसऱ्या देशावर केलेले आक्रमण सर्वांसाठीच विनाशकारी ठरते. तसे आक्रमण मूर्खपणाचे असल्याचा धडा त्या महायुद्धाने जगाला शिकवला, असे ते म्हणाले.
राजनाथ यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानलाही घेरले. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांचा निषेध करतो. एससीओचा दहशतवादविरोधी आराखडा महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.
अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थिती हा आमच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. अफगाणमधील शांतता प्रक्रियेसाठी तेथील सरकारचे आणि जनतेचे आम्ही समर्थन करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. एससीओ सदस्यांमध्ये पाकिस्तान, कझाखस्तान, किरगिझस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तानचाही समावेश आहे.