संतोष कचरे आंबेगाव बुद्रुक, दि. 26 -पुणे-सातारा मार्गावरील कामे गेली दहा ते बारा वर्षे सुरू आहेत. यातून या मार्गावरील अपघातांचा प्रश्न कायम आहे. विशेषत: पुणे हद्दीत येताना वाहनांचे अपघात होत आहेत. कात्रज-नवले पूल रस्त्यावर गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता पुणे-मुंबई महामार्गाप्रमाणेच ड्रोन कॅमेरे, इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) अशी यंत्रणा पुणे-सातारा महार्गावरही उभारणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून याबाबत प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र, केवळ आश्वासने आणि धोरणेच जाहीर केली जात असल्याने, प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने अतिवेग, नियम मोडणे, यंत्रणांचे दुर्लक्ष आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने पुणे-सातारा हा रस्ता अद्यापही असुरक्षितच असल्याचे वाहन चालकांचे मत आहे.
पुणे-सातारा महामार्गावर प्राधिकरणाकडून कोणतीही उपाय योजना केली गेलेली नाही. याच कारणातून अपघातांच्या घटना घडतच आहेत. पुणे हद्दीत कात्रज-नवले पूल दरम्यान अपघात घडल्यानंतर या मार्गावरील त्रुटी शोधण्यासाठी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना काम दिले गेले. या संस्थांकडून अहवालही दिला गेला. मात्र, या अहवालातील उपाययोजना अद्यापही कागदावरच आहेत. वाहतूक पोलिसांनी यात लक्ष देऊन काही प्रमाणात प्रयत्न केले असले तरी ते पुरेसे नसल्याचे वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
स्पीड व्हॅन गेल्या कोठे?
महामार्गावर वाहनांचा वेग 80 ते 100 किलोमीटर प्रतितास असावा, असा नियम आहे. मात्र, वाहनचालक नियम धुडकावून 120 ते 150 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवितात, अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी स्पीड मोजणारी यंत्रणा असलेल्या व्हॅन उभ्या करण्यात आल्या होत्या. यातून अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांना दिली जात होती. परंतु, सध्या या स्पीड व्हॅन महामार्गावर कोठेच दिसत नाहीत.