पुणे, (संजय कडू)- उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजापूर भवानी मंदिरातील दागिने, प्राचीन नाणी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करा, अशी विनंती करणारे स्मरणपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) राज्य सरकारला पाठवले आहे.
सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दै. “प्रभात’ला सांगितले की, “आम्ही राज्य सरकारला 10 दिवसांपूर्वी पत्र पाठवले आहे आणि आम्ही या संदर्भात सरकारी निर्देशांची वाट पाहत आहोत.’
“हे प्रकरण उघडकीस येताच 2020 मध्ये राज्य सरकारने सीआयडीला या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी पूर्ण करून, सीआयडीने 2020 मध्येच राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर केला होता. मात्र, आम्ही तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. कारण, या संदर्भात उस्मानाबाद पोलिसांनी आधीच फौजदारी गुन्हा दाखल केला होता. “सीआयडीने अहवालात तीन मुद्द्यांचा तपास केला गेला.
पहिले म्हणजे, प्रशासकीय त्रुटी, दुसरे म्हणजे गैरव्यवहार कसा झाला आणि शेवटी, या गैरव्यवहारामागे कोण होते .”आमचा अहवाल सविस्तर आहे आणि आम्ही गुन्ह्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेल्या गैरव्यवहारात सामील असलेल्या व्यक्तींची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राज्य सरकारला त्यावेळी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे स्मरणपत्र पाठवले आहे.
ऑडिटमध्ये उघड झाले घोळ
सीआयडी अधिकारी म्हणाले, “उस्मानाबाद पोलिसांनी मंदिराच्या माजी पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मंदिराच्या मौल्यवान वस्तूंच्या ऑडिटमध्ये 348 ग्रॅम सोने, 71 किलो चांदी आणि 71 प्राचीन नाण्यांचा तुटवडा उघड झाला आहे. या प्रकरणात सरकारने लवकरात लवकर गैरव्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी’