अरूण गोखले
जर कोणी एखाद्याची स्तुती केली, प्रशंसा केली, चांगलं म्हटलं, कौतुक केलं, तर कुणाला नको असतं? उलट असं मोठेपण मिरवायला, चार लोकांत आपली वाहवा करून घ्यायला सर्वांनाच आवडते. पण अशीही काही माणसे असतात की ज्यांना अशी खोटी प्रशंसा किंवा खोटा सन्मान नको असतो. चार चौघांत आपला होत असलेला सन्मान नाकारायचा यासाठीसुद्धा अंगी एक प्रकारचे धाडस असावे लागते. याची सुरुवात ही खरं तर बालवयातूनच व्हावी लागते. ते संस्कार बाल मनावर जर घट्ट बसले असतील तरच जीवनात अशा मोहाच्या क्षणांपासून माणसाला दूर राहता येते. एका सुसंस्कारीत बाल वयात हे धाडस दाखवणाऱ्या प्रामाणिक गोपाळची ही गोष्ट.
गोपाळ शाळेत असताना एकदा गणित विषयाच्या शिक्षकांनी एक अवघड गणित सर्व वर्गाला घातले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्याला जणू एक प्रकारचे आव्हानच दिले. त्या अवघड गणिताद्वारेच त्यांना वर्गातील सर्वात हुशार मुलगा कोण, त्याची निवड करायची होती. विद्यार्थ्यांनी ते गणित सोडविण्याचा प्रयत्नही केला. पण काही केले तरी ते गणित मात्र त्यांना सुटेना. त्यातसुद्धा ज्या काही एक-दोन मुलांनी ते गणित सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे उत्तर बरोबर आले नाही. केवळ एकाच विद्यार्थ्याने ते अवघड असलेले गणित अचूक सोडवले होते. ते त्याने सोडविलेले गणित पाहून गुरूजींना फार आनंद झाला. त्या विद्यार्थ्याच्या जवळ जात आणि कौतुकाने त्याला शाबासही देत गुरूजी म्हणाले,
“”वा, गोपाळ! सर्व वर्गात तूच एक असा हुशार विद्यार्थी निघालास कारण तू हे गणित सोडविले. छान मला तुझा अभिमान वाटतो. खरं तर तुझं कौतुक करावं तेवढे थोडंच आहे. तुझी हुशारी पाहून मला मोठा आनंद होतो आहे.” गुरूजींचे हे बोलणे ऐकून सारा वर्ग गोपाळकडे मोठ्या कौतुकाने पाहू लागला. गुरूजीही त्याची पाठ थोपटण्यासाठी पुढे झाले. पण त्याच वेळी गोपाळ मात्र उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला, “”गुरूजी! हे गणित मी एकट्याने जरी बरोबर सोडविलेले असले तरी त्याचे श्रेय मला देऊ नका.” “”म्हणजे, हे काय गोपाळ, मी
नाही समजलो तुझ्या बोलण्याचा अर्थ?” गुरूजी म्हणाले. तेव्हा गोपाळ म्हणाला, “”गुरूजी! काल माझ्या बरोबर अभ्यास करायला माझ्या शेजारचा एक मित्र आला होता. तो वरच्या वर्गात शिकतो. त्याने अशाच प्रकारचे एक गणित सोडविले होते. ते मी पाहिले, कसे सोडवायचे ते त्याच्याकडून नीट समजून शिकून घेतले. त्यामुळे मला हे तुम्ही घातलेले गणित त्याच पद्धतीचे असल्याने अगदी सहजतेने आणि अचूक सोडवता आले इतकेच. जर त्या माझ्या मित्राने मला ते गणित कसे सोडवायचे हे सांगितले नसते, शिकवले नसते तर आज वर्गातल्या इतर मुलांसारखा मीही ते गणित सोडवू शकलो नसतो. त्यामुळे मला असे प्रामाणिकपणे वाटते की मी या कौतुकाला पात्र नाही, जर कोणी पात्र असेल तर तो माझा मित्र आहे.” गोपाळचे हे प्रामाणिकपणे दिलेले उत्तर ऐकले आणि गुरूजींना त्याचा अधिकच अभिमान वाटू लागला. हा गोपाळ म्हणजेच “नामदार गोपाळ कृष्ण गोखले’.