ठेकेदारांच्या कामगारांना होतेय मारहाण महापालिका करणार गुन्हे दाखल
पुणे – शहरात समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत महापालिकेकडून निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींना सुमारे 2 लाख 80 हजार पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. मात्र, शहराच्या दक्षिण भागात सोसायटी तसेच व्यावसायिक मिळकतींना मीटर बसविण्यास मोठा विरोध केला जात आहे. मीटर बसविण्यासाठी आलेल्या ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे, मीटर बसविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. यातून महापालिकेच्या योजनेचा खर्च वाढत असल्याने आता महापालिका या कामासाठी थेट पोलिसांची मदत घेणार आहे. मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
याबाबतचे नियोजन पाणी पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तात मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. महापालिकेतर्फे समान पाणी पुरवठा योजनेचे काम 2017 मध्ये सुरू केले. आत्तापर्यंत 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेतून सोसायट्या, बंगल्यांमध्ये 2 लाख 40 हजार पाणी मिटर बसविले जाणार आहेत. आत्तापर्यंत 1 लाख 34 हजार 580 मिटर बसवून झाले आहेत.
समान पाणी पुरवठा योजनेचे 40 झोनचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तेथे मिटर बसविणे अशी छोटी कामे शिल्लक आहेत. पण काही नागरिक मिटर बसविण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत. महापालिकेकडून समान पाणी देण्यासाठी ही योजना आहे. त्यामुळे नागरिकांचाच फायदा होणार आहे.
– नंदकिशोर जगताप, पाणी पुरवठा विभाग, प्रमुख
या भागात होतोय विरोध
नगररस्ता, हडपसर तसेच मध्यवर्ती भागातील काही पेठांच्या परिसरात मीटर बसविण्यात आल्यानंतर सहकारनगर, पर्वती, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे आदी या भागात मिटर बसविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पेठा व सहकारनगर, कात्रज भागात पाणी मिटर बसविण्याच्या कामास स्थानिक राजकीय पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते विरोध करत आहेत. काही सोसायट्यांचे पदाधिकारीही विरोध करत आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी राजकीय कार्यकर्ते नागरिकांचे नाव पुढे करत मीटर बसविण्यासाठी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी विरोध करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजूत काढून निघून गेल्यानंतर मीटर बसविण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात आहे.