पुणे – काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराच्या शीलान्यासाला अनुमती दिली होती. रामराज्य आणण्याचे वचन त्यांनी दिले होते. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, अशी भावना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जवळ येवून ठेपला आला आहे. श्री राम हे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा, भक्तीचा, श्रध्देचा विषय आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले असले तरी हा सोहळा कुणा एकाचा, एका पक्षाचा नसून तो सर्व राम भक्तांचा आहे.
राम मंदिर उभारण्यात आजवर अनेकांनी योगदान दिले. राम मंदिराच्या लढ्यात कारसेवकांनी दिलेले योगदान हेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक कार सेवकानी यासाठी बलिदानही दिले. ते विसरता येणार नाही. कारसेवेत बलिदान दिलेल्या हजारो कारसेवकांची कुटुंब उध्वस्त झाली. ज्या कारसेवकांनी राममंदिराच्या लढ्यात प्राणांची आहुती दिली त्या कारसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष निमंत्रित करुन त्यांचा यथोचित गौरव करणे हेही आवश्यक आहे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.
ते पुढे म्हणाले, अयोध्येत होणारा हा सोहळा राजकीय इव्हेंट होतो आहे. वास्तविक, आध्यात्मिक आणि धार्मिक सोहळा म्हणून याकडे पाहिले जायला हवे होते. आता ज्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना, सिने कलावंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यातील बऱ्याच व्यक्तींचा हा राम मंदिर लढ्याशी काहीही सबंध नाही.
राम मंदिर हा देशातीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांचे श्रद्धेचे ठिकाण असून २२ जानेवारी रोजीच्या सोहळ्यात मंदिरासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कारसेवकाना, प्राणांची आहुती दिलेल्या कार सेवकांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घ्यायला हवे असेही ते म्हणाले.