पुसेगाव – मकरसंक्रांतीला तिळासह तिळाच्या लाडूंना विशेष महत्त्व असते. महिलांचा महत्त्वपूर्ण सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणावर तिळाच्या वाढत्या दराचा प्रभाव पडण्याचे चिन्हे दिसून येत आहेत. तिळाचे दर मागील वर्षीपासून वाढल्याने मकरसंक्रांतीच्या उत्सवातील महिलांचे बजेट बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.
खटाव तालुका व जिल्ह्यात तिळाचे उत्पादन कमी प्रमाणात घेतले जाते. परिणामी बाहेरुन येणाऱ्या तिळावर जिल्ह्याचा भर असतो. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी परराज्यातही तिळाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात तिळाची आवक कमी झाली आहे. परिणामी तिळाचे दर आपसुकच वाढलेले आहेत. मागणीनुसार तिळाची आयात न झाल्याने बाजारपेठेत तीळ प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांप्रमाणे वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मागच्या वर्षी १५० ते १६० रुपये किलोला उपलब्ध होणारे तीळ एकाएकी २४० रुपयांपर्यंत वर गेले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन, घेवडा असले तरी काही शेतकरी तिळाचेही उत्पादन घेत आले आहेत. मात्र, हे प्रमाण अल्प आहे. लगतच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात राज्यांतून तीळ आयात केले जातात. मात्र, यंदा संबंधित राज्यांत तिळाचे उत्पादन कमी झाल्याने आवकही काहीशी मंदावली आहे. परिणामी संक्रांतीसाठी तिळाचे दर वाढले आहेत.
मकरसंक्रांतीला तिळाचे पदार्थ बनविण्यावर भर दिला जातो. तीळगुळाचा लाडू सर्वांना प्रिय असल्याने दरवर्षी संक्रांतीला लाडू बनविले जातात. मात्र, यंदा तिळाचे दर वाढल्याने लाडू बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. आधीच जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाढल्याने बजेट पूर्णतः बिघडले आहे. त्यातच संक्रांतीच्या उत्सवात तिळाचे दरवाढीची भर पडली आहे. मात्र, उत्सव असल्याने दराकडे दुर्लक्ष करीत तिळाची खरेदी करावीच लागणार आहे.
– सौ. नीता राजेघाटगे (गृहिणी, बुध)