पुणे -देशात ऑक्सिजनची मागणी वाढल्यावर केंद्र सरकारने त्यावर नियंत्रण ठेवणे सुरू केले. रेमडेसिविर बाबतचे अधिकारही स्वत:कडे घेतले. त्यामुळे जोपर्यंत केंद्र सरकार लस, इंजेक्शन आयातीसाठी मान्यता देत नाही, तोपर्यंत याचा तुटवडा जाणवणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधान भवन (कौन्सिल हॉल) याठिकाणी पवार यांच्या उपस्थितीत करोना परिस्थिती आढावा बैठक पार पडली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रासह देशात ऑक्सिजनची मागणी वाढत असल्यामुळे सर्व प्लांटवर केंद्र सरकारने नियंत्रण ठेवले आहे. त्यामध्ये गुजरातच्या जामनगरमधून महाराष्ट्राला मिळणारा ऑक्सिजन कमी करण्यात आला. त्यावर केंद्र सरकारला विनंती केली, “आमचा ऑक्सिजन वाढवू नका, पण आहे तेवढा तरी कायम ठेवा.’ माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनीही राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन उत्पादनाबाबत सूचना दिल्या आहेत. सरकारने रेमडेसिविरबाबतही सर्व नियंत्रण स्वत:कडे घेतले. त्यामुळे महाराष्ट्राला दररोज 35 हजारांचा इंजेक्शन कोटा 25 हजारापर्यंत आला.
केंद्राकडून येणाऱ्या व्हेंटिलेटरबाबत पवार म्हणाले, “केंद्राचे सर्व व्हेंटिलेटर अद्याप आले नाही, मात्र ते येण्यास सुरुवात झाली आहे. बंद पडलेले व्हेंटिलेटर दुरुस्त केल्याचे महापौरांनी बैठकीत सांगितले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत चांगल्या प्रतीचे व्हेंटिलेटर असावेत, असे सांगून पवार यांनी केंद्राला टोला लगावला.
20 ऑक्सिजन प्लांट उभारणार
पुणे जिल्ह्यात “सीएसआर’च्या माध्यमातून 20 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा काहीसा कमी होण्यास मदत होईल. त्यामध्ये जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधीतून 10, पुणे महापालिका 6 आणि पिंपरी-चिंचवड 4 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत, असे पवार म्हणाले.