पुणे – येत्या 1 मेपासून राज्यात 18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, याची जबाबदारी राज्याने घ्यावी, असे केंद्र सरकार म्हणत आहे. तर, देशभरातील अन्य राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे टोलवाटोलवी न करता महाराष्ट्राने लसीसाठी “ग्लोबल टेंडर’ अर्थात जागतिक पातळीवर निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमण्यात आली असून, सर्व अधिकार त्यांना देण्यात आले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ग्लोबल टेंडरबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात दररोज एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट असून, आपण 85 हजारापर्यंत पाहचलो. मात्र, लसीचा पुरवठा कमी झाल्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. दरम्यान, 1 मे रोजी राज्यात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. केंद्र सरकारकडून जेवढ्या लसीचे डोस मिळतील तेवढे घेण्याबरोबरच बाहेरूनही लस घेण्याबाबत सरकारने सहकार्य करावे. आम्ही त्याचे पैसे आम्ही देऊ, असेही पवार म्हणाले.
मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील
राज्यातील नागरिकांना लस मोफत देणार का? याबाबत अजित पवार म्हणाले, दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री त्याबाबत घोषणा करतील. गॅस योजनेमध्ये गरिबांना गॅस मिळावा, यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी सबसिडी सोडून द्यावी. असे आवाहन केंद्र सरकारने केल्यावर काही जणांनी सबसिडी सोडली, त्याप्रमाणे ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, त्यांनी लस विकत घ्यावी, जेणेकरून गरजू आणि गरिबांना लस मोफत मिळेल.
मंगळवेढा येथील बाधितांना जबाबदार कोण?
मंगळवेढा निवडणुकीनंतर तेथील करोनाबाधितांची संख्या वाढली, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता “त्याला कोण जबाबदार? नागरिकच’! असे अजित पवार म्हणाले. आयोगाने निवडणूक लावल्यामुळे ही निवडणूक झाली, पण त्यांना जबाबदार धरू शकत नाही. आमच्या अधिकारातील सर्व निवडणुका आम्ही रद्द केल्या होत्या. दरम्यान, निवडणुकीतही सर्व नियमावली ठरवली होती, त्याचे तंतोतंत पालन व्हावे असेही सांगण्यात आले, असे पवार म्हणाले.
लसीच्या पुरवठ्याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही लस देऊ शकत नाही. मात्र, जेवढी शक्य होईल, तेवढी आम्ही देतो असे त्यांनी सांगितले आहे. सध्या पूनावाला हे अन्य देशात आहेत. ते पुण्यात आल्यावर पुढील चर्चा करू.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री