कानपूर –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणात माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधानांना वर्तमानकाळातील मुद्यांना उत्तर द्यायचे नाही. म्हणूनच ते कॉंग्रेस पार्टीच्या इतिहासातील विषय उपस्थित करत आहेत, असे बघेल यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बघेल यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी पदयात्रा घेतली होती. त्यादरम्यान त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
पंतप्रधानांनी नेहरू आणि इंदिरा गांधींबाबत जी टीका केली, त्याला नेहरू किंवा इंदिरा गांधी यापैकी कोणीही उत्तर देऊ शकत नाही. त्याऐवजी भाजपने वर्तमानकाळातील मुद्यांना उत्तर द्यावे.
नोटाबंदीनंतर आतापर्यंत किती काळा पैसा परदेशातून परत आला. जीएसटी लागू झाल्यानंतर अर्थकारणामध्ये काय सुधारणा झाली, लॉकडाऊनमुळे देशाचे किती नुकसान झाले आदी प्रश्नांवर पंतप्रधान बोलू इच्छित नाहीत, म्हणूनच ते जुने मुद्दे उपस्थित करत आहेत, असे बघेल म्हणाले.