पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस चालकाचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला आहे. हा खून त्याच्या दोन मित्रांनी केला. खून केल्यानंतर यातील एक आरोपी चालकाच्या मुलाच्या मागे विळा घेऊन धावला होता. मात्र मुलाने पळ काढून स्वत:चा जीव वाचवला. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघाही आरोपींना टेरेसवर पाठलाग करुन पकडले. ही घटना जांभूळवाडी येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली आहे.
राजेंद्र बाजीराव दिवेकर (56, रा. जांभूळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ अशोक कुंभार (28 रां. जांभूळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर ( 20 , रा. धनकवडी) यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राजेंद्र दिवेकर हे पीएमपीमध्ये चालक असून दोघेही आरोपी त्यांच्या घरापासून जवळच एका खोलीत रहातात. यामुळे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती.
राजेंद्र दिवेकर यांनी सोमनाथ कुंभारला काही दिवसांपुर्वी दहा हजार रुपये उसने दिले होते. हे मागण्यासाठी जातो असे सांगून दिवेकर हे शुक्रवारी रात्री घरातून बाहेर पडले होते. दरम्यान रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मुलगा दोन वेळा दिवेकर यांना ‘घरी जेवायला चला’ म्हणून आणण्यासाठी गेला होता. मात्र दिवेकर यांनी ‘मी जेऊन येतो’ असे सांगत घरी येण्यास नकार दिला. दरम्यान, दिवेकर हे दोघाही आरोपींबरोबर मद्यपान करत बसले होते.
दिवेकर यांची सकाळी पाचच्या सुमारास ड्युटी असते, यामुळे त्यांच्या पत्नीने चार वाजता उठून बघितले असता, दिवेकर आलेले दिसले नाही. त्यांनी मुलाला उठवून त्यांना बोलवून आणण्यास सांगितले. मात्र मुलाने झोपेतून उठून जाण्यास नकार दिल्याने त्यांची पत्नी आरोपीच्या घरी गेली. तिथे जाताच तिला घराच्या बाहेर रक्त सांडलेले दिसले. ती तशीच धावत घरी आली आणि मुलाला काही तरी अघटीत घडले असल्याचे सांगितले.
…मुलाच्या मागे आरोपी धावला विळी घेऊन
मुलाने आरोपीच्या घरी धाव घेऊन दरवाजा उडला असता, यातील एक आरोपी रक्त पुसून घेत होता तर दुसरा आरोपी दिवेकर यांचा मृतदेह चादरीत गुंडाळत होता. हे पाहताच मुलाने आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली. यातील एक आरोपी मुलाच्या मागे विळा घेऊन लागला. ‘तुझ्या बापासारखा तुझाही खेळ करतो’ असे म्हणत त्याच्या मागे पळू लागला. मात्र मुलाने पळ काढत थेट दत्तवाडी पोलीस चौकी गाठली.
तेथे रात्रपाळीच्या पोलिसांना खबर दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी धावत गेले. पोलिस आल्याची चाहुल लागताच आरोपींनी घराचा दरवाजा आतून बंद केला. यानंतर ते घराचा पत्रा उचकटून दुसऱ्या घराच्या टेरेसवर गेले. तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी टेरेसवर धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले.
“दोघेही आरोपी मिळेल ते काम करतात. त्यांना मृत व्यक्तीने काही पैसे उधार दिले होते. दारु पिताना पैशावरुन वाद झाला. यानंतर लाकडी दांडक्याने आणि विळ्याने खून करण्यात आला. आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरुन पळून जाताना अटक केली.” -विनायक गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
गुन्हेगारीमागे अंमली पदार्थांचे रॅकेट –
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोथरुड, सिंहगड रोड, नऱ्हे, मुळशी आदी परिसरातील गुन्हेगार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आले आहेत. त्यांना येथे सहजा सहजी अंमली पदार्थ मिळतात. अमंली पदार्थाची नशा चढल्यावर ते आक्रमक होऊन शरीराविरुध्दचे गुन्हे आणि लूटमार करतात. महाविद्यालय परिसरात बंदी असूनही बेकायदा सुरु असणाऱ्या हुक्का आणि सिगरेट विक्रीच्या दुकानांमधून सर्रास अंमली पदार्थांची विक्री होते. ही दुकाने भारती विद्यापीठ चौकीच्या हाकेच्या अंतरावर आहेत.
या व्यावसायिकांमुळे महाविद्यालय आणि शाळेतील विद्यार्थीही नशेच्या आहारी गेले आहेत. यासंदर्भात काही राजकीय नेत्यांनी आंदोलने केली होती, तर काहींनी थेट गृहमंत्र्यांकडे धावही घेतली होती. मात्र अशा व्यावसायिकांना अभय देण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातील दोनही आरोपींनी अंमली पदार्थांची नशा केली असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.