- अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद
- खासगी कार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश
- रेल्वे, बस सेवा मात्र सुरू ठेवणार
- वाहतूक सेवांबाबत परिणाम पाहून निर्णय
मुंबई : बृहनमुंबई विकास प्रधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या सर्व शहरातील खासगी कार्यालये, दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बंदीतुन अत्यावश्यक सेवा आणि बॅंकिंग सेवा वगळण्यातआल्या आहेत. त्याच बरोबर सरकारी कर्मचारी 25 टक्केच कार्यालयात उपस्थित राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. या उपाय योजनांतून जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मात्र रेल्वे आणि बस सेवा बंद करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई प्रधिकरण क्षेत्रात ही बंदी लागू आहे. या क्षेत्रात नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात ही बंदी लागू आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. मात्र त्यावेळी माणुसकीचे नाते घट्ट ठेवून सोबतच आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये, असे आवाहन त्यांनी केले.
जरी हे बंद जाहीर केले असले तरी त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधे, दूध आणि अन्य अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे.
या चार महानगरात राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित हे बहुतांश बाहेरील देशांतून आलेले आहेत. त्यामुळे या चार शहरात बंदीचा निर्णय घेण्यात आला. आपण स्वत:वर निर्बंध घालून घेतले नाही तर आणखी निर्बंध जबरदस्तीने लादावे लागतील, असे त्यांनी सांगितले.