पुणे, दि. 23 -दिवाळीनिमित्त शहर आणि परिसरातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. प्रवाशांची संख्या अधिक असताना देखील रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडल्या नसल्याने शनिवारी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मुत्यू झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांत उमटू लागली आहे. रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
पुणे स्थानकातून रोज 140 हून अधिक गाड्या सुटतात. यात 38 लोकल, 5 पेक्षा अधिक पॅसेंजर आणि 90 ते 95 एक्स्प्रेसचा समावेश आहे. यातील केवळ 19 गाड्या या पुण्यातून सुटतात. 19 पैकी तीन गाड्या रोज सुटतात, तर 16 आठवड्यातील काही गाड्या दिवसाआड सुटतात. दिवाळीनिमित्त पुणे आणि परिसरातून खूप मोठ्या संख्येने नागरिक गावी जातात. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळी विशेष गाडी सोडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणीचा गांभीर्याने विचार ने केल्यामुळे शनिवारी पुणे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. यात एका प्रवाशाचा नाहक बळी गेला. पुणे स्थानकातून पुणे-अजनी आणि हडपसर-नांदेड एक्स्प्रेस या दोनच विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. काही गाड्यांच्या डब्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. दोनपैकी एक गाडी एसी आहे, तर ज्या गाड्यांचे डबे वाढविले आहेत, ते देखील एसी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा विशेष फायदा होताना दिसत नाही.
उत्तर भारतातील विशेष महत्व असलेली छटपूजा काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. पण इतर राज्यांत जाणारी एकही विशेष गाडी सोडण्यात येणार नसल्यामुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वे प्रशानाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. गाड्यांची संख्या कमी असल्याने गाडीमध्ये खाली बसून, तर कोणी शौचालयाच्या बाहेर बसून प्रवास करताना दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन महत्वाच्या सणांच्या वेळेस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून नियोजन करण्यात कमी पडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दानापूरसाठी दोन विशेष गाड्या
पुणे रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असून, बिहारसाठी दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रविवारी घेतला.त्यामुळे दिवाळी आणि छटपूजानिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दिवाळी सुरू झाली आह.े तसेच काही दिवसांवर छटपूजा आली असल्याने नागरिक गावी जात आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मुत्यू झाला होता. त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने दानापूरसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे स्थानकातून पुणे-दानापूर एक्स्प्रेस मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनटांनी सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दानापूरवरून सकाळी 11 वाजता सुटणार आहे. ही गाडी दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळमार्गे दानापूरला जाणार आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ
पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी रोखण्यासाठी 24 ते 31 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिट 10 रुपयांवरून 30 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.