पुणे, दि. 16 -महापालिकेकडून शहरात 2500 कोटींच्या समान पाणी योजनेचे काम सुरू आहे. समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून शहरात 82 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यातील 16 टाक्यांसाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. एकूण टाक्यांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 20 टक्के आहे. त्यामुळे पाण्याच्या टाक्याच नसतील तर पालिका समान पाणी देणार कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या योजनेतील टाक्यांचे काम 2017 मध्ये सुरू झाले असले तरी गेल्या पाच वर्षांत अवघ्या 40 टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मार्च 2023 मध्ये या कामाची मुदत संपत आहे.
महापालिकेकडून समान पाणी देणाऱ्या या योजनेचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 287 कोटींच्या 82 टाक्या उभारण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात 1600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या तर तिसऱ्या टप्प्यात सव्वातीन लाख पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. ही तीनही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने 2017 मध्ये या योजनेचे भूमीपूजन करुन पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू करण्यात आले होते. त्यात या टाक्या पूर्ण होईपर्यंत जलवाहिन्या पूर्ण करून त्याला जोडणे आणि शेवटच्या टप्प्यात मीटर बसविणे अशा कामांचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात जलवाहिनीचे आणि टाक्यांचे काम रखड्ले असून, पालिकेकडून मीटर बसविण्याच्या कामावर जोर देण्यात येत आहे. त्यामुळे टाक्याच नसतील तर मीटर बसवून महापालिका समान पाणी देणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जागाच अद्याप ताब्यात नाहीत
दरम्यान, महापालिकेस ज्या 16 ठिकाणी टाक्या प्रस्तावित केल्या होत्या, तिथे प्रत्यक्षात पालिकेच्या ताब्यात जागा नसल्याने टाक्या बांधता न येणे, जागा कमी असणे, काम सुरू झाल्यानंतर त्यावर आक्षेप आल्यामुळे काम बंद करावे लागणे अशा कारणांचा समावेश आहे. या ठिकाणांमध्ये चिखलवाडी (लष्कराने काम थांबविले), स्वारगेट येथील पालिकेच्याच पाणी पुरवठ्याच्या जागेत मेट्रोचे काम सुरू असल्याने चार टाक्यांसाठी जागा नाही. एसएनडीटी टेकडी, खैरेवस्ती, चिखलवाडी दर्गा, धानोरी, नगर रस्ता बिशप शाळा येथील दोन आणि भाजी मंडई येथील एका टाकीसह, पर्वती, क्रीसेंट हायस्कूल आणि स्वारगेट पोलीस लाईनमधील एका टाकीचा समावेश आहे.