पुणे, दि. 16 -“हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शनाला आमचा विरोध नाही; परंतु त्यामध्ये दाखवलेला चुकीचा इतिहास यावर आमचा आक्षेप आहे. त्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांना आम्ही कायदेशीर पत्र देऊ तसेच सेन्सॉर बोर्डालाही आम्ही यासंदर्भात पत्र पाठवणार आहोत, अशी भूमिका वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.
प्रा. रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे, महेश देशपांडे तसेच “चंद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज संस्थे’चे मंदार कुलकर्णी, राहुल दिघे आणि राजेंद्र देशपांडे यावेळी उपस्थित होते.
“”आम्ही हा चित्रपट स्वत: पाहिला आणि त्यात दर्शवलेल्या काही संदर्भांबद्दल आक्षेप नोंदवत आहोत, असे प्रा. रुपाली देशपांडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा उल्लेख बाजीप्रभू कधीच “अरे तुरे’ असा करणार नाहीत. याशिवाय हिरडस मावळात समुद्र किनारा दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे समुद्रच नाही. याशिवाय मावळात इंग्रज येऊन त्यांनी महिलांना नेले, असा प्रसंग दाखवण्यात आला होता. मुळात त्या काळात मावळात इंग्रजांचे एवढे प्राबल्य होते का, हा प्रश्न आहे,” असे मुद्दे पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले. “बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी यांच्यात त्यांच्या लहानपणीचे एक भांडण दाखवले आहे. त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही, वास्तविक पन्हाळ्याच्या लढाईत त्या दोघांनी एकत्रित प्राणांची आहुती दिली. त्यांची समाधी आजही एकमेकांच्या शेजारी आहे,” असा आक्षेप यावेळी नोंदवण्यात आला.
“अफजल खानाचा वध महाराजांनी केला तेव्हा बाजीप्रभूंना दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात तेथे बाजीप्रभू उपस्थित नव्हते. बाजीप्रभू हे बांदलांच्या सैन्याचे नेतृत्त्व करत होते. बांदल आणि बाजीप्रभू यांच्यातील काही प्रसंगही चुकीचे दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या वंशजांना तो दाखवावा, अशी मागणी आम्ही केली होती; परंतु त्यांनी ते केले नाही,” असेही या मंडळींनी सांगितले.