पुणे – देशातील विषमता दूर करुन समता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भरीव कार्य केलेले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार व कार्य आत्मसात करुन ते आचारणात आणण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
दरम्यान आधुनिक भारत घडवायचा असल्यास समतेशिवाय पर्याय नाही, असे मत सी.टी.बोरा महाविद्यालयातील डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील बुध्दिस्ट सेंटरच्या वतीने 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मनोज पांडकर होते. यावेळी बुध्दिस्ट सेंटरचे समन्वयक डॉ.गौतम बनसोडे यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांनी देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. जातीव्यवस्था, विषमता नष्ट व्हावी यासाठी त्यांनी विशेष कार्य केलेले आहे. हे कार्य सतत जागृत ठेवले पाहिजे. त्यांचा समतेचा विचार आत्मसात केला पाहिजे, असे डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी स्पष्ट केले आहे.
आता काळ बदलत चाललेला आहे. कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेच लागणार आहेत. कायदा करुन समाज बदलत नाही. बदलासाठी मानसिकता असावी लागते. नीती ही माणसाला जीवंत ठेवण्यासाठी व जगण्यासाठी बळ देत असते,
असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. समाजविज्ञान कोषाचा प्रत्येकांनी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गौतम बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन रिमा खरे यांनी केले. आभार संपत शिंदे यांनी मानले.