पुणे, दि. 6 -शहरात गुरुवारी वारजे, कोथरूड, औंध, सहकारनगर, कात्रज व नगर स्त्याच्या काही भागांत आज (गुरुवारी) पाणी बंद ठेवण्यात येणार होते. मात्र, महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून पाणी बंदची अर्धवटच माहिती जाहीर करण्यात आल्याने अनेक भागातील नागरिकांना पाणी येणार नसल्याची माहितीच नव्हती. परिणामी, या नागरिकांना ऐन सणासुदीत पाण्यासाठी वणवण करावी लागली.
गेल्या काही दिवसांपासून वारजे जलकेंद्र तसेच पर्वती जलकेंद्रात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. महापालिकेने या प्रकाराबाबत महावितरणकडे तक्रार केल्याने महावितरणने गुरुवारी (दि. 6 ऑक्टोबर) काम करण्याची तयारी दर्शविली. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने लगेचच गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारी पाणीपुरवठा विभागाकडून अर्धवटच माहिती जाहीर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या ही बाब लक्षात आली. मात्र, त्यानंतर लगेच बुधवारी प्रसार माध्यमांना दसऱ्याची सुटी असल्याने ही माहिती नागरिकांपर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे सकाळी पाणी न आल्याने नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे विचारणा केली. प्रामुख्याने सहकारनगर, महर्षीनगर, पद्मावती, बिबवेवाडी, औंध, नगर रस्ता, शिवाजीनगर परिसर, खडकी, औंधला या अघोषित पाणी बंदचा फटका बसला.
चौकशीची मागणी
या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पाणीपुरवठा विभाग आणि जनसंपर्क विभागात समन्वय नसल्याने नागरिकांना माहिती मिळाली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली असून, या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.