प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 -सूस मधील महादेवनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. परंतु, निधी नसल्याचे कारण पालिकेकडून दिले जात आहे. याच कारणातून गेली कित्येक महिने या रस्त्याचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे, पालिकेच्या अशा कारभाराला कंटाळून
या भागातील नागरिकांनी आता स्वत:च्या खर्चातून या रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. स्वातंत्र्यदिनी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व स्थानिक नागरिकांनी आपल्या स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरू केला आहे. तरीदेखील पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
सूसमधील रयत विद्यार्थी परिषदेचे खजिनदार ऋषिकेश कानवटे, अशोक लिपणे, बबन गडसिंग, मल्लिनाथ बिराजदार, हनुमंता पुजारी, भगवान आंबुरे, हरी पवार, अमोल चव्हाण, धोंडीराम रेंगे, प्रमोद चांदरे, सुनील चांदरे, सचिन कामटकर, अनिल अंभोरे, प्रकाश सामाले, केशव पवार, पिराजी कानवटे, माणिक अंभोरे या सर्वांच्या पुढाकारामुळे या रस्त्याचे तात्पुराते काम करण्यात आले. यातून यसा रस्त्याची अवस्था येण्या-जाण्या योग्य झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.