बिबवेवाडी, दि. 19 (प्रतिनिधी) – स्व. मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये स्वच्छतागृह सफाई कर्मचाऱ्याचे घर आगीत जळून खाक झाले. सामाजिक बांधिलकी जपत गुलटेकडीतील एकता प्रतिष्ठान व एकता तरुण मित्र मंडळाने दहीहंडीचा खर्च टाळून वस्तीतील जळीतग्रस्तांना भांडी तसेच धान्य किराणा अशी मदत केली.
स्व. मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रमिला किशोर बाबुळकर यांच्या घरातील वस्तू जळून खाक झाल्या. या जळीतग्रस्त कुटुंबास मदत करण्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले. यातून धान्य-किराणा तसेच आवश्यक संसारोपयोगी साहित्य कुटुंबाला मदत म्हणून देण्यात आले.
करोनामुळे दोन वर्षापासून सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी मोठ्या आनंदाने दहीहंडी साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र, एकता तरुण मंडळाने सर्व समावेश विचार करून दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करीत वस्तीतील जळीतग्रस्तांना मदत केली. या मदत कार्यात गणेश शेरला, संतोष मोरे, नितीन गायकवाड, सचिन खंडागळे, राहुल लोंढे, हरीष पुटगे, महेश सांळुके, अन्वर शेख, अमोल अर्कल आदी उपस्थित होते.
दहीहंडीचा सण साजरा करताना गुडटेकडी, बिबवेवाडी परिसरात बऱ्याच ठिकाणी डी.जे.च्या आवाजावर युवक थिरकत होते, अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमही पाहण्यास मिळाले तर दुसरीकडे वसाहतीमध्ये सामाजिक हिताची जाणीव ठेऊन गुलटेकडी एकता प्रतिष्ठानने जळीत ग्रस्तांना केलेली मदत चर्चेचा विषय ठरली.