2024 च्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या वल्गना भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी केल्या आहेत. कॉंग्रेसमुक्त देशनंतर प्रादेशिक पक्षमुक्त भारत करण्याची आकांक्षा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलून दाखवली आहे. लोकसभेच्या 45 तर विधानसभेच्या दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याबद्दलचा आत्मविश्वास भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करून दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या एका जनमत पाहणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वादातीत असल्याचे दिसून आले आहे. या ऑगस्टमध्ये नवा अध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती कॉंग्रेसने यापूर्वीच दिली होतीढ परंतु अध्यक्ष निवडीची कोणतीही प्रक्रिया सुरूच झालेली नाही.
कॉंग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत हलाखीची असून, भाजपला देशव्यापी आव्हान कोण देईल, याबद्दल अनिश्चितता आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आवाज सध्या कमी झाला आहे. त्यांच्यातच पक्षाचे मंत्री व नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना पक्ष फोडला गेल्यानंतर मूळ पक्षाची ताकद कमालीची क्षीण झाल्यामुळे, तूर्तास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता नाही. बिहारमध्ये भाजपला टांग मारून जनता दल संयुक्त किंवा जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता पक्षासमवेत नवे सरकार स्थापन केले आहे. नितीशकुमार यांनी राष्ट्रीय राजकारणात भूमिका वठवण्याची इच्छा लपवलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी “मेक इंडिया नंबर वन’ प्रचारमोहीम हाती घेतली आहे.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये या मोहिमेचा शुभारंभ करताना त्यांनी सुशासनासाठी पाचकलमी कार्यक्रम जाहीर केला. जगात भारत देश हा सर्वोत्कृष्ट ठरावा आणि तो विकसित देशांच्या यादीत यावा, यासाठीची ही राष्ट्रीय मोहीम आहे आणि त्यात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही मोहीम अराजकीय असून, त्यामध्ये भाजप, कॉंग्रेस व इतर कोणत्याही पक्षाचे कर्यकर्ते सामील होऊ शकतात, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत देशाची प्रगती मंदगतीने झाली असून त्यात जे जे पक्ष सत्तेवर होते ते यास जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. भाजप, कॉंग्रेसचे नाव न घेताही, त्यांच्याचकडे केजरीवाल यांचा इशारा होता, हे उघड आहे. या पक्षांकडे पुन्हा देशाची सत्ता सोपवल्यास देश 75 वर्षे मागे पडेल. काही पक्ष घराण्याच्या हितासाठी चालवले जातात, तर काही सत्ताधाऱ्यांच्या मित्रमंडळींसाठी, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
नेहरू-गांधी घराणे फक्त घराण्याचे हित पाहते आणि भाजप निवडक उद्योगपतींचे हितसंबंध जपतो, असेच त्यांना म्हणायचे आहे. “मेक इंडिया नंबर वन’साठी केजरीवाल हे आता देशाचा दौरा करणार असून, 2024च्या निवडणुकांची ही पूर्वतयारीच होय, असे म्हणायला पाहिजे. “आप’ने देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली आहे. आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका “आप’ गंभीरपणे लढवणार आहे. अन्य राज्यांमधील निवडणुका लढवण्याचाही “आप’चा विचार सुरू आहे. गोवा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत “आप’ला अपयश आले. परंतु पंजाबात “आप’ पक्ष सत्तेवर आला. देशात भाजपला आपणच राष्ट्रीय पर्याय देऊ शकतो, असे “आप’तर्फे सूचित केले जात आहे. 2014 मध्ये मोदींविरुद्ध वाराणसी येथून केजरीवाल यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांचा दारुण पराभव झाला होता. “आप’ला देशात दिल्लीव्यतिरिक्त कुठेही यश मिळाले नव्हते. त्यानंतर “आप’ने दिल्ली व पंजाबवरच लक्ष केंद्रित केले. पंजाबमधील यशानंतर “आप’चा आत्मविश्वास वाढला आहे.
भाजपला आव्हान देतानाच, सॉफ्ट हिंदुत्व, तसेच भाजपच्याच छापाचा राष्ट्रवाद जागवण्याचा “आप’चा प्रयत्न असल्याचे दिसते. येत्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि गोवा या राज्यांत आपल्याला बऱ्यापैकी जागा मिळतील, असे “आप’ला वाटते. तसा त्यांचा प्रयत्नही असून, सुरतमधील पालिका निवडणुकीत “आप’ने चांगले यश मिळवले होते. भाजपला आपण राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकू आणि आज ना उद्या पंतप्रधानही होऊ, अशी केजरीवाल यांची मनीषा दिसते. वास्तविक खऱ्या अर्थाने कॉंग्रेस हाच राष्ट्रीय पक्ष असून, भाजपला त्यातल्या त्यात समर्थ पर्याय तोच देऊ शकतो, असे आताचे चित्र आहे. परंतु कॉंग्रेस सध्या नेतृत्वहीन असून, त्यात कोणतेही चैतन्य नाही.
भाजपला पर्याय ठरू शकेल, असा नवा अजेंडाही कॉंग्रेस देत नसून, तो तीच तीच जुनाट भाषा वापरत आहे. केजरीवाल यांच्याकडे कल्पकता असून, तरुणांना व सर्वसामान्य मतदारांना कोणत्या गोष्टी आकर्षित करून घेतील, हे त्यांना नीट ठाऊक आहे. केवळ नवी दिल्लीच नाही, तर पंजाबमधील मतदारांना त्यांनी आपल्याकडे खेचून घेतले व तसा आकर्षक कार्यक्रम पुढे ठेवला. पंतप्रधानांनी याला “रेवडी संस्कृती’ असे म्हटले असले, तरी त्यामुळे “आप’ला मते मिळाली, हे सिद्ध झाले आहे. जनतेला अपील होईल, असा स्पष्ट संदेश देणे आणि जी आश्वासने दिली आहेत, ती अमलात आणण्याचे मॉडेल लोकांपुढे ठेवणे, या दोन गोष्टीच मोदींना पर्याय देऊ शकतात, असे मत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
केजरीवाल यांच्याकडे नेतृत्वगुण आहेतच. पण आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे “कम्युनिकेशन स्किल’ही त्यांच्याकडे आहे. शिवाय हे घराणेशाहीतून आलेले नेतृत्व नाही. तसेच त्यांची व्यक्तिगत प्रतिमा स्वच्छ आहे. भारतीय महसूल सेवेतील सनदी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले असून, आरटीआय नेते म्हणूनही त्यांचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे. केंद्रीय सत्तेशी मुकाबला करत, त्यांनी दहा वर्षे यशस्वी वाटचाल केली आहे. आधुनिक काळातील जाहिरात व प्रचारतंत्रावर केजरीवाल यांची पकड आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी आतापासूनच करण्याचे चातुर्य “आप’ने दाखवले असून, याचे फळ त्यांना केव्हा ना केव्हातरी मिळाल्याशिवाय राहणार नाही. 2024 मध्ये केजरीवाल पंतप्रधान झाले नाहीत, तरी भविष्यातील पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून “आप’चा विचार करावा, असा संकेत केजरीवाल देऊ पाहात आहेत.