औंध – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाकड, विशालनगर, पिंपळे निलख येथे मुळा नदीपात्राचा सर्वे केला. यातून वाकड, विशालनगर, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख परिसरातील सोसायट्यांमधून नाल्यांमधून आणि मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने जलपर्णी वाढत असल्याचे निरीक्षण प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवले होते. याबाबत महापालिकेला अहवालही देण्यात आला. परंतु, पालिका प्रशासनाकडून संबंधीत परिसरातील सोसायट्यांना याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याने सांडपाणी नदी पात्रात थेट सोडले जात आहे.
बालेवाडी ते बोपोडीपर्यंत मुळा नदीमध्ये जलपर्णी फोफावली आहे. परंतु, महापालिकेतर्फे कोणतीही ठोस उपाय योजना याकामी करण्यात आलेली नाही. यातून परिसरामध्ये डासांचा उपद्रव वाढत असून दुर्गंधी पसरत आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदी स्वच्छतेकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने जलपर्णी वाढत असताना कोणतीही उपायोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे जलपर्णी वाढत असल्याची बाब समोर आली आहे. येत्या आठ दिवसांत जलपर्णी काढली गेली नाही तर आम्ही काढू आणि पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनांमध्ये आणून टाकू, असा इशारा रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे यांनी दिल आहे.
जलपर्णीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलपर्णी काढण्याची वारंवार मागणी करून देखील यावर काही ठोस उपाय योजना करण्यात येत नाही. लवकरात लवकर परिसरातील जलपर्णी न काढल्यास आंदोलन करण्यात येईल.
– कैलास गायकवाड,माजी नगरसेवक