पुणे –केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या परीक्षणासाठी केंद्राच्या 8 टीम पुण्यात दाखल झाल्या असून त्यांच्याकडून शहराच्या स्वच्छतेची कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे हे पथक शहरात असेपर्यंत सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच परिमंडळ उपायुक्तांनी कार्यालये सोडून बाहेरू जाऊ नये तसेच पथकासोबतच राहावे असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी दिले आहेत. हे पथक आयत्यावेळी तपासणीस पोहोचल्यानंतर अधिकारी अथवा पालिकेचे कर्मचारी सोबत नसल्यास पथकाकडून थेट पालिकेचे गुण कमी केले जात असल्याचा प्रकार या पूर्वीही घडला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेकडून स्वच्छ
सर्वेक्षण स्पर्धेत शहराचा पंचतारांकीत दर्जासाठी मानांकन जाहीर केले आहेत. त्यात, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, शहरातील दैनंदिन स्वच्छता, शहरातील कचरा प्रकल्प, पालिकेकडून राबविण्यात आलेल्या अभिनव योजनांसह नागरी सहभागावर शहराला गुण दिले जातात. मागील वर्षी महापालिका देशात या सर्वेक्षणात पाचव्या क्रमांकावर होती. त्यामुळे महापालिकेने यंदा पहिल्या तीन मध्ये येण्यासाठी कंबर कसली असून महापालिकेच्या स्वच्छतेच्या कामकाजाचे सर्वेक्षण शुक्रवारपासून पुढील पाच दिवस हे पथक करणार आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.