पुणे – मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वकांक्षी टप्पा असलेला पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्प वेगाने सुरू आहे. 280 किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प सुमारे 4 हजार 819 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाच्या फेज-1 अंतर्गत, 155 किलोमीटरचे ट्रॅक दुहेरीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. यामध्ये पुणे-शिंदवणे, आंबळे-वाल्हा, लोणंद-आदर्की, सातारा-कोरेगाव आणि शेणोली-नांद्रे या भागांचा समावेश आहे. आता पुढील टप्प्यात उर्वरित 125 किलोमीटर ट्रॅक दुहेरीकरण केले जाणार आहे. यात कामे वेगाने सुरू असून, काही प्रमाणात पावसामुळे अडथळे येत आहेत. या टप्प्यात शिंदवणे-आंबळे, वाल्हा-लोणंद, आदर्की-पळशी, जरंडेश्वर-सातारा, कोरेगाव-शेणोली आणि नांद्रे-मिरज या भागांदरम्यानचे ट्रॅक दुहेरीकरण समाविष्ट आहे.
या महत्त्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे पुणे-मिरज रेल्वे कॉरिडॉरचा विकास आणि आधुनिकीकरण होण्यास हातभार लागणार आहे. ज्यामुळे या भागाची पुणे आणि पुढे मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसे झाल्यास ट्रेन्सची संख्या आणि फेऱ्यादेखील वाढवता येणार आहेत.याबाबत मध्य रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “प्रशासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत पुणे-मिरज डबल लाइन प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचे प्रयत्न आहेत. यात प्रवासी आणि कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. शिवाय, काम करताना सध्या सुरू असलेल्या ट्रेन्सच्या मार्गात अडथळे न येवू देण्याचे उद्दिष्ट आहे.’ दरम्यान, या कामामुळे गेल्याच आठवड्यात पुणे-कोल्हापूर-पुणे आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. तर, काही ट्रेन्स अन्य मार्गांनी वळवण्यात आल्या होत्या.
पुणे-मिरज दुहेरीकरणाचे फायदे
- पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल
- अत्याधुनिका पायाभूत सुविधांमुळे ट्रेनचा वेग वाढेल
- ट्रेन क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ कमी होईल
- रेल्वे विभागाची कार्यक्षमता वाढेल.
- मालवाहतूक आणखी वेगाने होऊन शेतकऱ्यांना फायदा