नीरा – साखर कारखान्यासाठी 1/7 ची लागवड म्हणजेच 1 जुलैला केलेल्या ऊस लागवडीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे रविवारी (दि. 1)च्या मुहूर्तावर पुरंदर तालुक्यातील ऊस भागात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे.
शेतकऱ्यांनी उसाचे बेणे आपल्या शेतात अंथरले आहे. आता प्रतीक्षा आहे ती शेतात पाणी येण्याची. दरम्यान, पुढील 10 दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार लागवडीचे संकट येऊ शकते.
यावर्षी पाऊस लांबल्याने ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लागवड कमी झाली आहे गेल्यावर्षी सोमेश्वर कारखान्यावर एक जुलैला 4700 एकर ऊस लागवडीची नोंद झाली होती; मात्र यावर्षी 2900 एकर ऊस लागवडीची नोंद झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र पुरंदर तालुक्यातील जेऊर, मांडकी, पिसूर्टी, नीरा, गुळूंचे गावात असून ऊस लागवड सुरू आहे. पावसाने ओढ दिली असली तरी जुलैमध्ये पाऊस पडेल आणि पाणी टंचाई दूर होईल अशा आशावादातून शेतकऱ्याने उसाचबेन लावले आहे. मात्र, यातील बहुतेक गावात पावसाचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. वीर धरणातील पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे, त्यामुळे ऊस लागवडीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.
ऊस लागवड गेल्यावर्षी पेक्षा कमीच
गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी ऊसाची लागवड कमी झाली आहे. गेल्यावर्षी 4700 एकर उसाची लागवड झाली होती तर यावर्षी 2900 एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तर पुरंदर तालुक्यात यावर्षी 645 एकर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. ती सुद्धा गेल्यावर्षीच्या प्रमाणात कमी आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोपाच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. उसाचे रोप मिळायला उशीर होत आहे त्याचा परिणाम लागवडीवर होत आहे. तर पाऊस कमी असल्याने सुद्धा काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले नाही. मात्र पुढील काळात लागवड होईल, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांनी दिली.